Crowds of devotees at Machhindranath Fort
आष्टी, पुढारी वृत्तसेवा आष्टी तालुक्यातील सावरगाव जवळ गर्भगिरी पर्वतरांगांमध्ये वसलेल्या मच्छिंद्रनाथ गड येथे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला लाखो भाविकांनी उपस्थित राहून सद्गुरु मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. नवनाथांपैकी एक असलेल्या मच्छिंद्रनाथ यांच्या या पवित्र स्थळावर महाराष्ट्रासह देशभरातून भक्तांचा जनसागर लोटला होता.
वर्षातून केवळ एकदाच दर्शनासाठी खुली होणारी ही संजीवन समाधी पाहण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. दुचाकी व चारचाकी वाहनांचा मोठा ओघ दिवसभर सुरू होता.
या पार्श्वभूमीवर अंभोरा पोलीस ठाण्याचे पीआय मंगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिस्तबद्ध नियोजनामुळे कोणतीही अनुचित घटना न घडता भाविकांना शांततेत व सुरळीतपणे दर्शन घेता आले. दरम्यान, आमदार सुरेश धस यांच्या नियोजनामुळे यंदा दर्शन प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली.
काही पारंपरिक रूढींमध्ये आवश्यक बदल करून दर्शन लवकर खुले केल्याने प्रत्येक भाविकाला समाधीचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले. आष्टी येथील सद्गुरु सेवेकरी मंडळाच्या वतीने सुमारे ५० हजार भाविकांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
दाल-खिचडी, बुंदीचे पाकीट व पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच बेलगाव येथील गाई मंदिर ट्रस्टतर्फे गेल्या १४ वर्षांप्रमाणे यंदाही सायंकाळी चहा-बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली. सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की जय, अलख निरंजन आदेश अशा जयघोषांनी गड परिसर दुमदुमून गेला होता. आतिषबाजी आणि रोषणाईमुळे गड उजळून निघाला. या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे भाविकांना आध्यात्मिक समाधानाची अनुभूती लाभली.