Crop growth slowed down due to lack of rain: Double sowing crisis
शिवनाथ जाधव
टाकरवण : माजलगांव तालुक्यातील टाकरवण परिसरात पावसाळा सुरू होऊन दीड महिने झाले, त्यातही पावसाचे दिवस कमी अन् ढगाळ वातावरणाचेच दिवस जास्त राहिले. रिमझिम पावसाशिवाय मोठा पाऊस झाला नाही, परिणामी टाकरवण व परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. पिकांची वाढ खुंटली असून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
जून आणि जुलै या दोन महिन्यांचा कालावधी पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाचा असतो. परंतु अद्यापही पाऊस नसल्याने कापूस, सोयाबीन पिकांची वाढ म्हणावी तशी झालेली नाही. काही ठिकाणी पिकाचे मूळ करपत असल्याचे, तसेच पिके पिवळी पडू लागल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर काही भागांत पिकांवर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या तक्रारी येत आहेत. जून आणि जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत टाकरवण व परिसरात केवळ १०० ते १५० मिलिमीटर पाऊस झाला आहे.
या कालावधीत सरासरी ५०० मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित होते. समाधानकारक पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. माजलगांव तालुक्यामध्ये जवळपास ९० टक्के खरिपाची पेरणी पूर्ण झालेली आहे. त्यात सोयाबीन आणि कापसाची सर्वाधिक पेरणी झालेली आहे. हरीण व इतर वन्यप्राण्यांकडून पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या प्राण्यांचे कळप पिकांत घुसून कोवळी पिके फस्त करीत आहेत.
पावसाअभावी यंदा खरिपाच्या पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यात वन्यप्राण्यांकडून सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ही पिके जगवायची कशी, असा प्रश्न आमच्यासमोर आहे.- हनुमान वराट शेतकरी, टाकरवण
पावसाळ्याचे दोन महिने सरले, तरीही नदी-नाले कोरडेच आहेत. विहिरीची पाणीपातळी खालावत चालली आहे. हीच परिस्थिती राहिली तर पिके वाचवणे जिकिरीचे होणार आहे.- पांडुरंग कदम, शेतकरी रामनगर