बीडच्या वाहतुकीला लागणार शिस्त file photo
बीड

बीडच्या वाहतुकीला लागणार शिस्त

चार चौकांमध्ये सिग्नल सुरू होणार; उर्वरित तीन ठिकाणचाही प्रस्ताव

पुढारी वृत्तसेवा

Beed's traffic is set to become disciplined

बीड, पुढारी वृत्तसेवा बौडमध्ये गाड़ी चालवणारा कुठेही गाडी चालवू शकतो.... असे विनोदाने म्हणतात. कारण बीडमध्ये कोणता वाहनचालक कोणत्या बाजुने येईल, कोणत्या बाजुला जाईल हे सांगता येत नाही, पण आता या वाहतूकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शहरातील चार प्रमुख चौकामध्ये सिग्नल बसवण्यात आले असून महिनाभरात ते कार्यान्वीत होतील अशी माहिती वाहतूक शाखेचे सपोनि सुभाष सानप यांनी दिली.

बीड शहरातील प्रमुख चौकांमध्ये सकाळी व संध्याकाळी वाहतुकीची कोंडी होते. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरनाका, साठे चौक व शिवराज पान सेंटरसमोरील चौकातून वाहनांची मोठी वर्दळ असते. परिणामी वाहतूकीची कोंडी, छोटे मोठे अपघात हे नित्याचेच वनले आहेत.

या ठिकाणची वाहतूक सुरळीत करतांना पोलिसांचीही दमछाक होत होती. ही बाब लक्षात घेवून आता प्रशासनाकडून सिग्नल उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार दोन दिवसांपासून यासाठीचे खांब उभारण्याचे काम सुरु आहे. आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करुन येत्या महिनाभरात हे सिग्नल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर नाका, साठे चौक व शिव ाजीनगर पोलिस ठाण्यासमोरील चौकात कार्यान्वीत होणार आहेत. यामुळे या ठिकाणच्या वाहतूकीला शिस्त लागणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात बार्शी नाका, सांगली बैंक कॉर्नर व बसस्थानक या ठिकाणी देखील सिग्नल बसवले जाणार असल्याची माहिती सपोनि सुभाष सानप यांनी दिली.

बसस्थानक, नगर नाका, साठे चौकात रिक्षावाल्यांची मनमानी

बीड शहरातील नगर नाका, बसस्थानक व साठे चौक परिसरात प्रवाशी घेण्यासाठी रिक्षाचालक वाट्टेल तिथे रिक्षा उभा करतात. विशेषतः बसस्थानकातून बस ज्या गेट मधून आत-बाहेर जातात त्याच्या अगदी समोरच चार-दोन रिक्षाचालक ठाण मांडून असतात. या ठिकाणी अनेकदा बस वळवांना अडचणी येतात, इतर मोठ्या गाड्या वळतांनाही रिक्षांचा अडथळा होतो, परंतु मुजोर रिक्षाचालक एक इंचही हालत नाहीत. यामुळे वाहतुकीची कोंडी होते, विशेषतः सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत असे प्रकार सर्रास चालतात, या रिक्षाचालकांवर कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रस्त्याच्या बाजूचे अतिक्रमण कधी काढणार?

बीड शहरातील नगररोड, जालना रोड, बार्शी रोड हे वर्दळ असणारे मार्ग आहेत, अशा रस्त्यांवर तसेच प्रमुख चौकालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलेले आहे. छोटेमोठे व्यापाऱ्यांनी रस्त्यापर्यंत आपले व्यवसायांचा 'विस्तार' केला आहे, त्याच्या पुढे त्यांच्याकडे खरेदीकरिता येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्या उभा केलेल्या असतात, अनेक फळ व भाजीपाला विक्रेते देखील रस्त्यावरच दुकान मांडतात, त्यावर नगरपालिका अथवा वाहतूक विभाग कारवाई का करत नाही? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT