Beed News: March for compensation for soybean losses
धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर तालुक्यातील अंजनडोह परिसरातील सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करून शासनाकडून नुकसानभरपाई व आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी अंजनडोह ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि. १३) मोटारसायकलवरून तहसील कार्यालय व कृषी कार्यालय गाठत जोरदार घोषणाबाजी केली.
अंजनडोह परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेंगांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये सोयाबीनच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने पंचनामे करावेत, नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करावा आणि पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई व आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नसता २० ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांतील आहे. पूर्वी कृषी विभागाचे अधिकारी व कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांनी अंजनडोह परिसरातील काही शेतांमध्ये जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली होती. यावेळी किडीच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.शेतकरी सुनील बाबासाहेब सोळंके यांच्या गट क्रमांक १०३ मधील सोयाबीन पिकाचीही पाहणी करण्यात आली. परिसरातील इतर शेतांमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
तातडीने पंचनामे करण्याची मागणी
अंजनडोह परिसरातील सर्व नुकसानग्रस्त सोयाबीन शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत, नुकसानीची नोंद घ्यावी, नुकसानीचा अहवाल शासनाकडे तातडीने सादर करावा आणि पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत व शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच सोयाबीन पिकावरील किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन व आवश्यक उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली. या आंदोलनात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह अंजनडोह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते-
हातात सोयाबीन घेऊन घोषणाबाजी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हातात सोयाबीनच्या शेंगा व पीक घेऊन मोटारसायकलवरून गावातून तहसील कार्यालय व कृषी कार्यालय गाठले. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत किडीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने दखल घेण्याची मागणी केली. शासनाने विलंब न करता पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.