शशी केवडकर
बीड : बीड येथे दोन दिवसांच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने बांधलेल्या बसस्थानकाचे तीनतेरा वाजवले आहेत. निकृष्ट दर्जाचे काम केल्याने अवकाळी पावसातच या बसस्थानकाची अशी बिकट अवस्था झाली असून, पावाळ्याआधीच गळती लागली आहे.
दरम्यान, बसस्थानकातील कोपऱ्यातील पत्रा हा वादळी वाऱ्याने निसटून खाली पडला, मात्र सुदैवाने यात प्रवाशास कुठलीही इजा झाली नाही. अशा निकृष्ट कामाबाबत परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी हे मात्र मूग गिळून गप्प आहेत. तर काहींनी मात्र हतबलता व्यक्त केली.
बीड जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून वादळी वार्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले असून, याचा फटका रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही बसला आहे. बीड साठी कोट्यवधी रुपये खर्चून पत्र्याचे शेड बांधण्यात आलेले बसस्थानक आता प्रवाशांसाठी जीवघेणे ठरत आहे. नुकतेच बांधून पूर्ण केलेल्या या नवीन बसस्थानकाची अवकाळी पावसाने बिकट अवस्था केली आहे.
परवा संध्याकाळी आलेल्या वादळी वार्यासह अवकाळी पावसाने बसस्थानकातील करोडो रुपये खर्च करून टाकलेले पत्रे निघून खाली पडली आहेत. सुदैवाने यात कोणाला इजा झाली नाही, मात्र अवकाळी पावसातच नवीन बसस्थानकाची अशी अवस्था असेल तर पावसाळ्यात या ठिकाणी काय परिस्थिती असेल, अशी चिंता प्रवासी व्यक्त करत आहेत.
या बसस्थानकावर गरोदरमाता, दिव्यांग, वयोवृद्ध, लहान मुले तसेच महिला प्रवासासाठी बसस्थानकात येतात. अशा वेळी अशीच दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल प्रवासी करत आहेत. पूर्वीचे जुने बसस्थानक हे खूप वर्षे टिकले याचे कारण ते बांधकाम चांगल्या पद्धतीचे होते, मात्र आता कंत्राटदाराचा खिसा भरण्यासाठी परिवहन विभागातील स्थापत्य विभाग हा काम करत असल्याचे या घटनेवरून प्रकर्षाने जाणवत आहे.
दरम्यान, या विभागातील स्थापत्य अभियंता मंजुळे यांच्याशी याबाबत माहिती घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला, मात्र संबंधित अधिकारी यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. विभागीय नियंत्रक अंजली दुसाने यांच्याशीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याही यावर बोलण्यासाठी उपलब्ध नाहीत, असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
बीड जिल्ह्यासह बीड विभागातील जवळपास पाच ते सहा बसस्थानक हे याच कंत्राटदार कंपनीकडे असल्याची माहिती याच विभागातील एका अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले असून, या कंपनीने निकृष्ट काम केले असल्याबाबत एका अहवालातही शासनास कळविले असल्याचे त्यांनी सांगितले.
कंपनीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी संपादन केल्याने असे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणावर होत असल्याची खंत त्यांनी यावेळी दैनिक पुढारीकडे व्यक्त केली. बसस्थानकाचे अजून बरेच काम बाकी असताना कंपनीने हे बसस्थानक परिवहन विभागाकडे हस्तांतरित केले आहे.
पोर्चमधील पाणी बाहेर पडले, बाकी काही झाले नाही : समीर काझी
बीड बसस्थानक बांधकामात कुठलीही त्रुटी आमच्याकडून राहिली नाही. काही लोक जाणीवपूर्वक आम्हाला राजकीयदृष्ट्या बदनाम करण्यासाठी फेक व्हिडिओ व्हायरल करत आहेत. परिवहन विभागाच्या अधिकार्याने सांगितल्यानुसारच आम्ही काम केले आहे. आमच्याकडून कुठलीही चूक अथवा कामातील त्रुटी राहिली नाही, आम्ही हे बसस्थानक सहा महिन्यांपूर्वीच विभागाकडे हस्तांतरित केले आहे.
धोकादायक बसस्थानक - बीड बसस्थानकातील काम हे केवळ खराबच नाही तर ते धोकादायक करण्यात आले आहे. सध्या अवकाळी पावसाने या बसस्थानकाचे तीनतेरा वाजवले असून, प्रत्यक्ष पावसाळ्यात याची काय अवस्था होईल ही सांगण्यासारखे तरी राहील की नाही, अशी भीती वाटत आहे.एक प्रवासी, बीड बसस्थानक