बीड : बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या १९ वर्षीय नवमातेला गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज द्यावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. बीडच्या जिल्हा रुग्णालयात सीझर शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिलेच्या पोटात हातमोजे आणि कागदी रुमाल राहिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात पुढील शस्त्रक्रिया केल्यानंतर या वस्तू पोटातून काढण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
संध्या सूरज गायकवाड (वय १९) यांच्यावर १ ऑगस्ट रोजी बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी सीझर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर चार दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यांना तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडत गेल्याने कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.
तपासणीदरम्यान पोटात काही अनोळखी वस्तू असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला. यानंतर त्यांनी पुणे येथील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी संध्या यांना दाखल केले परंतु त्या रुग्णालयांनी रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने दाखल करून घेतले नाही. त्यानंतर संध्या गायकवाड यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेनंतर पोटातून हातमोजे आणि कागदी रुमाल काढण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
सध्या संध्या गायकवाड यांची प्रकृती गंभीर असून त्या मृत्यूशी झुंज देत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांचे पती सूरज गायकवाड यांनी डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे पत्नीची ही गंभीर अवस्था झाल्याचा आरोप केला आहे.संध्यांच्या आईनेही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, माझ्या मुलीने बाळाला जन्म दिला, मात्र आज तिच्यामध्ये त्या बाळाला कुशीत घेण्याचीही ताकद राहिलेली नाही असे म्हटले असून या सर्व प्रकाराला जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे.
या गंभीर प्रकरणाची आरोग्य विभागाने दखल घेतली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश कुमार सोळंके यांनी संबंधित महिला डॉक्टर आणि शस्त्रक्रियेत सहभागी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे बीड जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवा आणि शस्त्रक्रियेदरम्यानच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. चौकशीत नेमके काय समोर येते आणि या प्रकरणात कोणावर कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.