Majalgaon Saraswati River Pollution
माजलगाव : तालुक्यातील देवळा परिसरात पर्यावरणाला धक्का देणारी गंभीर घटना उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तीने टँकरच्या माध्यमातून सरस्वती नदी परिसरात केमिकलयुक्त पाणी टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली असून त्यामुळे नदीकाठावरील पाणी दूषित झाले आहे. या दूषित पाण्याचा परिणाम पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींवर तसेच शेतकऱ्यांच्या बोअरवेलवर झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नदी परिसरातील बोअर व विहीरीतील पाण्याचा रंग बदललेला दिसून आला तसेच तीव्र दुर्गंधी पसरल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. विशेष म्हणजे विहिरीतील काही मासे व कासव मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जलचर प्राण्यांच्या मृत्यूमुळे पाण्यात विषारी घटक मिसळल्याची शक्यता अधिक बळावली आहे. देवळा, पुणंरोसन वसाहत या भागातील पाणीपुरवठा संबंधित विहिरींवर अवलंबून आहे. दूषित पाणी झिरपल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या बोअरवेलमध्येही हे केमिकलयुक्त पाणी गेल्याची शक्यता असून पिकांना अशा पाण्याचा फटका बसल्यास उत्पादन घटण्याची व मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून नदी व विहिरीतील पाण्याचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, दोषी व्यक्तींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी तसेच नागरिकांना स्वच्छ पर्यायी पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी देवळा येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास उमरी व देवळा येथील नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. परिसरातील पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय अत्यंत गंभीर असून तातडीच्या उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे.
देवळा येथील सरस्वती नदीमध्ये असलेली पाणीपुरवठा विहिरी मधून देवळा व पुणंरोशन वसाहत या गावांना पाणीपुरवठा होणार आहे. मात्र सध्या या विहिरीचे काम अर्धवट असल्याने पाणीपुरवठा केला जात नाही परंतु भविष्यात जर असे केमिकल युक्त पाणी आले तर या गावातील नागरिकांना धोका निर्माण होणार आहे.
पात्रुड ते रोड लोणगाव या परिसरात रोडच्या बाजूने अज्ञात व्यक्तीने टँकरने केमिकल युक्त पाणी टाकल्याने या रोडहून ये- जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीयुक्त वासाचा सामना करावा लागत आहे.