Kej Wife Murder Case
केज : तालुक्यात घडलेल्या एका थरारक खून प्रकरणात न्यायालयाने आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पत्नीच्या गळ्यावर आणि छातीवर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून करण्यात आला होता. विशेष म्हणजे, गुन्हा केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला होता.
या प्रकरणाची माहिती अशी की, केज तालुक्यातील ढाकेफळ येथील चौसा वस्तीवर ७ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारास भगवान शाहूराव थोरात (वय ३३) याने त्याची पत्नी आरती भगवान थोरात (वय २२) हिचा निर्घृण खून केला. चारित्र्याचा संशय तसेच प्लॉट खरेदीसाठी माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. घरात कोणी नसताना आरोपीने घराबाहेरच पत्नीवर कुऱ्हाडीने वार करत तिची हत्या केली.
घटनेनंतर आरोपीने वापरलेली कुऱ्हाड मृतदेहाजवळच टाकून तो थेट युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गेला आणि गुन्ह्याची कबुली दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ अजय पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास पूर्ण झाल्यानंतर प्रकरण न्यायालयात चालले. सरकारी पक्षाच्या वतीने साक्षीदारांचे जबाब, परिस्थितिजन्य पुरावे आणि वैद्यकीय अहवाल यांच्या आधारे आरोप सिद्ध करण्यात आले. एकूण नऊ साक्षीदारांच्या साक्षीवर न्यायालयाने विश्वास ठेवला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी आरोपी भगवान थोरात याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच दहा हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली.
या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही परिस्थितिजन्य पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध करण्यात आला. बचाव पक्षाने अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा दावा केला होता, मात्र तो न्यायालयाने फेटाळला. मृत्यूपूर्वी महिला पतीच्या ताब्यात असल्याच्या मुद्द्यावरही न्यायालयाने भर देत हा निर्णय दिला.
या प्रकरणी सहाय्यक सरकारी वकील ॲड. राम बिरंगळ आणि त्यांना मदत करणारे सहाय्यक ॲड. रविकुमार उदार, पैरवीकर महिला पोलिस भालेराव यांनी परिश्रम घेतले.
आरती थोरात हिचा खून झाला त्यावेळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना केवळ साक्षीदार आणि परिस्थिजन्य पुरावा या आधारे सहाय्यक सरकारी वकील राम बिरंगळ यांनी बुद्धी चातुर्य व युक्तिवाद याच्या जोरावर आरोप सिद्ध करीत आरोपीला शिक्षा ठोठावली.
बचाव पक्षाच्या वतीने आरोपीचा बचाव करताना त्याचे वकील यांनी असा युक्तिवाद केला की, मयत आरती हिचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला त्यावेळी ती रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याने तिचा पती भगवान यांनी तिला उचलून दवाखान्यात घेऊन जात असताना त्यांच्या अंगावर व कपड्यावर रक्त लागले होते. मात्र हा बचाव मारेकऱ्याला शिक्षेपासून वाचवू शकला नाही.
शिक्षा सुनावताना न्यायालयाने मुंबई हाय कोर्टाचा त्रिमुख मारुती किरकोण विरुद्ध शासन या खटल्यातील मयत महिला ही तिच्या पतीच्या ताब्यात असताना तिचा झालेला मृत्यू याचा आधार आणि संदर्भ घेतला आणि त्या नुसार मारेकरी तिचा पती याला शिक्षा सुनावली.