Beed Ambajogai Woman Assault Case
अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून खून आणि हत्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, किरकोळ कारणांवरून जीवघेणे हल्ले होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशाच एका घटनेत अंबाजोगाई येथील चनई वडरवस्ती परिसरातील ५० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना शनिवार (दि. ११) रोजी घडली. मुलीला मारहाण का केली, असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या यशोदा बालाजी राठोड (वय ५०) यांच्यावर आरोपीने वीट फेकून मारली. विट डोक्यात लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, बुधवारी (दि. १५) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी राणी बालाजी राठोड (रा. चनई वडरवस्ती, किरमाणी दर्ग्याच्या पाठीमागे, अंबाजोगाई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये सुभाष लष्करे, मंदाकिनी सुभाष लष्करे, विश्व सुभाष लष्करे आणि ईंद्र सुभाष लष्करे (सर्व रा. चनई वडरवस्ती, अंबाजोगाई) यांचा समावेश आहे.
फिर्यादीच्या मुलीला आरोपींकडून मारहाण करण्यात आली होती. त्याबाबत विचारणा करण्यासाठी यशोदा राठोड गेल्या असता आरोपी सुभाष लष्करे याने शिवीगाळ करत त्यांच्या दिशेने वीट फेकली. ती थेट त्यांच्या डोक्यात लागल्याने त्या रक्तबंबाळ होऊन खाली कोसळल्या. दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी आलेले रोहन माणिक आडे तसेच फिर्यादी राणी राठोड यांनाही आरोपींच्या मुलांनी काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे.
प्रारंभी या घटनेत मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, यशोदा राठोड यांच्या मृत्यूनंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी सुभाष लष्करे याला अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब फड करीत आहेत.
यशोदा राठोड यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी बुधवारी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. काही काळ पोलीस ठाण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले.