बीड : आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन-चार दिवसांपासून बीड जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घाबरून गर्दी न करण्याचे आवाहन केले असून, जिल्हा पुरवठा विभागाने पेट्रोल कंपन्यांना जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा राखीव साठा ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी बीपीसीएल, आयओसीएल आणि एचपीसीएल या पेट्रोल कंपन्यांच्या जिल्हा समन्वयक व विक्री अधिकाऱ्यांना दि. 6 मार्च रोजी पत्र पाठवून पेट्रोल-डिझेलचा किमान राखीव साठा कायम ठेवण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. तसेच बीडसह गेवराई, अंबाजोगाई, माजलगाव, धारूर, केज, वडवणी, परळी, शिरूर कासार, आष्टी व पाटोदा येथील तहसीलदारांनाही या संदर्भात पत्र पाठवण्यात आले आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी इंधन पुरवठा व्यवस्थेतील अडचणी टाळणे अत्यावश्यक आहे. इंधन पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यास त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांसह शासकीय यंत्रणा, आपत्कालीन सेवा आणि वाहतूक व्यवस्थेवर होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक पेट्रोल पंपावर दैनंदिन विक्रीचा विचार करून पेट्रोल व डिझेलचा किमान राखीव साठा उपलब्ध ठेवणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पेट्रोल-डिझेलचा निर्धारित प्रमाणातील साठा कायम ठेवणे, साठ्यांची नोंद अद्ययावत ठेवणे आणि तपासणीसाठी उपलब्ध करून देणे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत शासकीय यंत्रणेला प्राधान्याने इंधन पुरवठा करणे अशा सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.दरम्यान, सदर सूचनांचे पालन न केल्यास लागू असलेल्या तरतुदीनुसार संबंधितांवर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी तंबीही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पेट्रोल कंपन्यांच्या समन्वयकांना दिली आहे.
सध्या बीड जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाईची कोणतीही परिस्थिती नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून अनाठायी इंधन साठा करण्याऐवजी आवश्यक तेवढाच वापर करावा. आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने पेट्रोल पंपांवर राखीव साठा ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यामुळे घाबरून गर्दी करण्याची गरज नाही.