बीड :बीड, परळी, धाराशिवसह संपूर्ण मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन गाड्या, महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याची मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.
रेल्वे मंत्री यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वेचे जाळे विस्तारणे अत्यंत गरजेचे आहे. धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वे मार्गाच्या ‘डीपीआर’साठी (सविस्तर प्रकल्प अहवाल) सर्वेक्षण मंजूर करण्यात आले असून, यामुळे जिल्ह्याच्या दळणवळण क्षेत्रात क्रांती होणार आहे.
बीड, परळी, धाराशिवसह संपूर्ण मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन गाड्या, महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बीडकरांचा रेल्वेचा प्रवास आता सुखकर झाला आहे.
18 सप्टेंबर 2025 पासून अहिल्यानगर-बीड ‘डेमू’ रेल्वे सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. मराठवाड्यातील महत्त्वाचे जंक्शन असलेल्या परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचा समावेश ‘अमृत भारत स्टेशन योजने’त करण्यात आला आहे. या अंतर्गत स्थानकावर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
सद्यस्थितीत येथे अत्याधुनिक प्लॅटफॉर्म शेडचे काम पूर्ण झाले आहे. वृद्ध व दिव्यांग प्रवाशांसाठी एस्केलेटर (स्वयंचलित जिने) बसवण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुलभ येण्या-जाण्यासाठी 12 मीटर रुंदीच्या भव्य ‘फूट ओव्हर ब्रिज’चे काम पूर्णत्वास गेले आहे. दरम्यान, अजून काही सुविधा देणे बाकी असून त्या सुविधात वाढ करावी, असेही म्हटले आहे.
बीडचा विकास हाच माझा केंद्रबिंदू आहे. रेल्वे सुविधांचा विस्तार केवळ प्रवासासाठी नाही, तर उद्योगांच्या वाढीसाठीही आवश्यक आहे. जनतेच्या सोयीसाठी माझा पाठपुरावा यापुढेही असाच सुरू राहील असे खा.सोनवणे यांनी सांगितले.