कडा : आष्टी तालुक्याची ‘कामधेनू’ म्हणून ओळख असलेल्या कडा येथील महेश सहकारी साखर कारखान्यातून कोट्यवधी रुपयांची महागडी मशिनरी चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच ही घटना उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील संशयितांची नावेही निष्पन्न झाली असून, लवकरच पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा गौप्यस्फोट माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केला.आष्टी येथील भगवान महाविद्यालयात बुधवारी (दि. 1 एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अशोक साळवे उपस्थित होते.
माजी आ. धोंडे यांनी कारखान्याच्या उभारणीपासून आजपर्यंतचा प्रवास उलगडताना सांगितले की, ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी हा कारखाना पुन्हा सुरू करणे अत्यावश्यक आहे. अनेक आर्थिक, प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणींवर मात करत प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून, येत्या गाळप हंगामात कारखान्याचे धुराडे पेटतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पामुळे शेतकरी, वाहतूकदार, पूरक उद्योग आणि स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. परिणामी, आष्टी तालुक्याच्या अर्थचक्राला नवसंजीवनी मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कारखान्याचे काम वेगाने सुरू असतानाच अज्ञात चोरट्यांनी अत्यंत महागडी आणि जड मशिनरी लंपास केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ही चोरी लाखोंमध्ये नसून थेट कोट्यवधी रुपयांची असल्याचे स्पष्ट करण्यात आले.विशेष म्हणजे, या प्रकरणातील काही संशयितांची नावे समोर आली असून, त्यांच्याविरुद्ध लवकरच अधिकृत तक्रार दाखल केली जाणार आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर मशिनरी चोरीला जाणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून, कारखान्याच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी संचालक मंडळ, शेतकरी आणि नागरिकांकडून होत आहे. चोरीमुळे कामाच्या गतीवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता असली तरी प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही धोंडे यांनी स्पष्ट केले.
चोरी झाली तरी कारखाना सुरू होणारच
महेश सहकारी साखर कारखाना हा या भागातील शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे. अनेक संकटांचा सामना करत हा प्रकल्प उभा राहत आहे. मशिनरी चोरीच्या घटनेमुळे आम्ही खचणार नाही. कोणत्याही परिस्थितीत येत्या गाळप हंगामात कारखाना सुरू करून शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करूच, असा ठाम निर्धार माजी आ. भीमराव धोंडे यांनी व्यक्त केला.