अंबाजोगाई ः विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी मंगळवारी (दि.10) बीड जिल्ह्याच्या विकासासह शेतकरी, युवक आणि वंचितांसाठी जाहीर करण्यात आलेल्या विविध योजनांचे जोरदार समर्थन केले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200 व्या जयंतीचे औचित्य साधून राज्य सरकारने आगामी वर्ष ‘सामाजिक समता वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, त्याचे आमदार मुंदडा यांनी स्वागत केले.
अर्थसंकल्पात बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या असून जिल्ह्याचा ‘आकांक्षित जिल्हा’ योजनेत समावेश करण्यात आला आहे. यामुळे शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून अतिरिक्त निधी उपलब्ध होणार असून जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला गती मिळणार आहे.
विशेषतः अंबाजोगाई येथील आशिया खंडातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचा कायापालट करण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या विषयासाठी आमदार मुंदडा या दीर्घकाळापासून पाठपुरावा करत होत्या, ज्याला आता यश आले आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने नैसर्गिक शेती अभियानांतर्गत पुढील दोन वर्षांत 5 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. रासायनिक खतमुक्त अन्नाची वाढती मागणी आणि जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरेल असे मुंदडा यांनी सांगितले.
तसेच गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढवून आता त्यात शेतमजुरांचाही समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे अपघातग्रस्त शेतमजुरांच्या कुटुंबांना मोठे आर्थिक संरक्षण लाभणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ता योजना आणि प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्ते व वीज प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.
राज्यातील सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील महान योगदानाची दखल घेत दिवंगत नेते अजित दादा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य स्मारक उभारण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. अजित दादांना आधुनिक पायाभूत सुविधा आणि निसर्गाची विशेष आवड असल्याने हे स्मारक त्यांच्या विचारांना साजेसे, आधुनिक आणि हरित असावे, अशी भावना मुंदडा यांनी व्यक्त केली. पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन सरकारने बळीराजाला मोठा दिलासा दिला असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.