अंबाजोगाई : विश्वासाच्या नावाखाली फसवणूक, प्रेमाच्या आडून शोषण आणि अखेरीस धर्मांतराच्या धमक्यांचा माराः अंबाजोगाई शहरात उघडकीस आलेल्या या प्रकरणाने समाजमन हादरून गेले आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका 28 वर्षीय महिलेवर तब्बल दोन वर्षे अत्याचार केला आणि पुन्हा विवाहासाठी धर्मांतराची सक्ती केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सलमान अजीज पठाणविरुद्ध फसवणूक, अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मूळची लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील रहिवासी असून, सध्या अंबाजोगाई येथे वास्तव्यास आहे. आरोपीने दोन वर्षांपूर्वी तिला लग्नाचे आश्वासन देत विश्वासात घेतले आणि त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र विवाहाचा विषय पुढे येताच त्याने टाळाटाळ सुरू केली.
तक्रारीनुसार, आरोपीने पीडितेसमोर मुस्लिम धर्म स्वीकारल्याशिवाय लग्न करणार नाही, अशी अट घालत तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला. याला पीडितेने विरोध केला असता आरोपीने शिवीगाळ करत तुला जे करायचे आहे ते कर, असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 69, 352 आणि 351 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जाधवर पुढील तपास करत आहेत.
आरोपीच्या शोधासाठी दोन पथके रवाना
या प्रकरणी संबंधित आरोपीच्या तपासासाठी दोन पथके तैनात केली असून, त्याचा शोध घेत आहोत. याशिवाय इतर कायदेशीर बाबींचीही पडताळणी करीत आहोत, असे पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.