सुभाष मुळे
गेवराई : पूरस्थितीमध्ये शेतकरी व नागरीकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. "आपत्तीच्या काळात सरकार ठामपणे आपल्या पाठीशी उभे आहे," असा विश्वास त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना देत बाधित शेतजमिनींचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत तसेच पूरस्थितीला भविष्यात तोंड देता यावे यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आखण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार यांनी प्रशासनाला दिले.
राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार यांनी आज गेवराई विधानसभा मतदारसंघातील पूरग्रस्त भागांना भेट देत शेतकरी व नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या. मौजे आहेरचिंचोली, खामगाव, नांदुर हवेली (ता. बीड) आणि मौजे ईटकुर (ता. गेवराई) या गावांमध्ये जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
अतिवृष्टी व पुरामुळे खचलेले रस्ते, नादुरुस्त झालेले पूल, वाहून गेलेल्या शेतीजमिनी, बाधित पिके तसेच कोसळलेली घरे या सर्व परिस्थितीचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला. यावेळी शेतकरी बांधवांसोबतच गावातील माता-भगिनींनी दादांशी संवाद साधला. त्यांनी मांडलेल्या समस्या व वेदना लक्षपूर्वक ऐकून घेत अजितदादांनी तत्परतेने मदत केली जाईल असे आश्वासन दिले.
अजितदादांच्या या भेटीमुळे आपत्तीग्रस्त शेतकरी व नागरीकांना दिलासा मिळाला असून प्रशासन व सरकार त्यांच्या पाठिशी उभे आहे, असा विश्वास त्यांना वाटू लागला आहे. यावेळी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.