अतुल शिनगारे
धारूर ः काळाबरोबर बदल स्वीकारत व्यवसाय टिकवण्याचे आव्हान आता डिजिटल बॅनर्स तयार करणाऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. एकेकाळी कापडा, पत्र्यावर रंगाच्या आधारे बॅनर्स, दुकानाचे फलक तयार करणाऱ्या चित्रकारांपुढे डिजिटलवाल्यांनी आव्हान उभे केले होते, आता त्यांच्यापुढे एआयने संकट निर्माण केले असून व्यवसायात मंदी आल्याने पर्याय शोधण्याची वेळ या व्यावसायिकांवर आली आहे.
सध्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे धारूर शहरासह परिसरातील अनेक पारंपरिक व्यवसायांपुढे नवे आव्हान उभे राहत आहे. विविध ऑनलाइन ॲप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधनांच्या मदतीने अवघ्या एका मिनिटात वाढदिवस, शुभेच्छा, महापुरुष जयंती, राजकीय व सामाजिक कार्यक्रमांचे डिजिटल बॅनर सहज तयार होत आहेत.
पूर्वी अशा बॅनरसाठी ग्राहकांना डिझायनर किंवा फोटो बॅनर व्यावसायिकांकडे जावे लागत असे. एका बॅनरसाठी साधारणपणे 100 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक खर्च करावा लागत होता. मात्र आता मोबाईलवरील विविध ॲप्समुळे कोणतीही व्यक्ती घरबसल्या काही क्षणांत आकर्षक बॅनर तयार करू शकते.
विशेष म्हणजे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी आणि शुभेच्छा संदेशांसाठी डिजिटल बॅनर तयार करून घेण्यासाठी डिझायनर्सशी मासिक पॅकेजच्या स्वरूपात करार करत असत.
अनेक व्यावसायिकांचे उत्पन्न यावर अवलंबून होते. मात्र सध्या ऑनलाइन ॲप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधनांच्या वाढत्या वापरामुळे ही पद्धत हळूहळू बंद पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.यामुळे बॅनर डिझाइनिंग व फोटो एडिटिंग व्यवसायावर मोठा परिणाम होत असून अनेक व्यावसायिकांच्या उत्पन्नात घट होत आहे.
लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.केवळ बॅनरच नव्हे तर लेखन, माहिती संकलन, फोटो संपादन आणि इतर अनेक सेवा आता ऑनलाइन उपलब्ध होत असल्याने विविध पारंपरिक व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तंत्रज्ञानामुळे कामे सुलभ होत असली तरी रोजगाराच्या संधी कमी होण्याचा धोका वाढत असून येत्या काळात ही बाब गंभीर सामाजिक आणि आर्थिक प्रश्न ठरू शकते.