Manoj Jarange Patil Protest ED Inquiry Demand
बीड, पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे यांनी पाटोदा येथे 20 दिवसांचे उपोषण स्थगित केल्यानंतर त्यांच्या आंदोलनावरून आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. जरांगे यांचे माजी सहकारी अमोल खुणे, अजय महाराज बारसकर, डॉ. संजय लाखे पाटील व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या आंदोलनात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे गंभीर आरोप केले. आता ईडीची पीडा मागे लागण्याची भीती असल्यानेच पाटोद्यात आंदोलन मागे घेतल्याचा दावाही त्यांनी केला.
शिरसाटांच्या बदनामीची ६ कोटींची सुपारी : खुणे
जरांगेंचे माजी सहकारी अमोल खुणे यांनी आंदोलनाला मिळालेल्या कथित आर्थिक रसदीवरून गंभीर आरोप केले आहेत. आंदोलनासाठी पैसे कोणी दिले, हे आपण सध्या सांगू शकत नाही; मात्र ईडीच्या चौकशीत त्याचा सर्व हिशेब समोर येईल, असा दावा खुणे यांनी शुक्रवारी (दि. १८) माध्यमांशी बोलताना केला.
आंदोलनाला कोणी पैसे दिले, हे पैसे कुणी आणले, कसे आणले आणि कुठे ठेवले, याचा तपास झाला तर सर्व बाबी समोर येतील, असे खुणे म्हणाले. आपण कोणत्याही मंत्री, आमदार किंवा खासदाराचे नाव घेणार नसून, या सर्व बाबी तपास यंत्रणाच उघड करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांना बदनाम करण्यासाठी जरांगे यांनी आ. अब्दुल सत्तार यांच्याकडून ६ कोटींची सुपारी घेतल्याचा दावाही खुणे यांनी केला.
पाटोदा येथूनच जनतेला यांची लायकी कळली असून, पुढील उपोषणाला कोणतेही शिष्टमंडळ किंवा मंत्री येणार नाहीत. एखाद्या महाराजांकडून किंवा गावातील माता-माऊलीकडून पाणी पिऊन उपोषण सोडण्याची वेळ येईल, असा दावा त्यांनी केला. मी करत असलेले आरोप खोटे असतील तर माझ्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा का दाखल केला जात नाही, असा सवालही खुणे यांनी उपस्थित केला.
उपोषण सोडतांना ठेकेदारच कसे लागतात? बारस्कारांचा सवाल
मुंबई: मनोज जरांगे यांना डिफेंडर देणारा भोसले कोण? जरांगेच्या मुलाकडे दोन लाखाचा मोबाईल कुठून आला? जरांगे उपोषण सोडत असताना तिथे ठेकेदार कसे आले? या ठेकेदारांचा विखे पाटलांशी संबंध काय? असे सवाल मराठा आरक्षणाचे अभ्यासक अजय महाराज बारस्कर यांनी उपस्थित केले आहेत. बारस्कर यांनी मुंबईत पत्रकार परिषदे घेत जरांगे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. बारस्कर म्हणाले, जरांगे यांच्या संदर्भात एक खळबळजनक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हे द्विट वैभव कोकाटे यांनी केलं आहे.
जरांगेंनी उपोषण सोडलं त्याठिकाणी किशोर बलांडे हे ठेकेदार काय करीत होते? या बलांडेच्या माणिक इन्फ्रा कंपनीला मागच्या काही वर्षात 750 कोटी रुपयांचं कंत्राट कसे काय मिळाले? जे आंदोलनात मध्यस्थी करतात त्यांच्या कंपन्यांनाच कंत्राट कसे मिळतात? याची उत्तरे जरांगे यांनी द्यावीत, असे ते म्हणाले. किशोर बलांडे यांना ईडीची नोटीस आली असेल. त्यामुळे ही नोटीस थांबवण्यासाठी तुम्ही आता आंदोलन मागे घेतल का? अनेक मराठा आंदोलकांनी आपला जीव मराठा आरक्षणासाठी गमावला. त्यामुळे तुम्ही उपोषण सोडत असताना या तरुणांच्या घरातील एकही व्यक्ती का नव्हती ? उपोषण सोडतेवेळी जरांगेंना कंत्राटदारच का लागतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
१४०० कोटींची कामे थांबविली : वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या सरकारला शिव्या खायची सवय झाली आहे आणि जरांगे यांच्या शिव्या खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही, असा आरोप केला आहे. जवळच्यांची सिंचन खात्यामधील चौदाशे कोटींची कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थांबविल्यामुळे जरांगे यांनी आंदोलन पुकारले. काम रद्द झाल्याच्या रागातून जरांगे बोलत होते का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. ईडी चौकशी काही लोकावर सुरू झाली, त्याचा राग आल्याने त्यांनी सरकारवर टीका केली, असे ते म्हणाले.