A major disaster was averted in the tricolor rally; Dr. Many including Pritam Munde escaped unharmed
माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'हर घर तिरंगा' अभियानाच्या पार्श्वभूमीवर माजलगाव शहरात गुरुवारी माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅली उत्साहात सुरू असतानाच छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ धोकादायक विद्युत खांबाला करंट असल्याचे निदर्शनास आले. प्रसंगावधान राखल्याने डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह रॅलीतील अनेक कार्यकर्ते व नागरिक बालंबाल बचावले. या प्रकारामुळे काही काळ रॅलीच्या ठिकाणी खळबळ उडाली. दरम्यान एक जण जखमी झाला आहे.
रॅली ज्या मार्गावरून जात होती, त्याच मार्गावरील विद्युत खांबाला विद्युत प्रवाह असल्याचे समोर आले. सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित असताना हा प्रकार घडल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. वेळीच हा धोका लक्षात आल्याने संभाव्य दुर्घटना टळली; मात्र प्रशासन आणि संबंधित यंत्रणेच्या पूर्वतयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोठ्या राजकीय किंवा सार्वजनिक कार्यक्रमांपूर्वी रॅलीच्या मार्गाची पाहणी, विद्युत खांबांची तपासणी आणि धोकादायक ठिकाणांची पूर्वकल्पना घेणे आवश्यक असते. मात्र, माजलगावातील या प्रकारामुळे अशी पाहणी नेमकी झाली होती का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, सार्वजनिक रस्त्यावर विद्युत खांबाला करंट असल्याचा प्रकार समोर आल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरातील धोकादायक व जीर्ण विद्युत खांबांची तातडीने तपासणी करून त्यांची दुरुस्ती अथवा आवश्यक ती कार्यवाही करावी, तसेच सार्वजनिक कार्यक्रमांच्या मार्गाची विद्युत सुरक्षेच्या दृष्टीने पूर्वतपासणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
राजकीय नेत्यांनीही कार्यकर्त्यांची काळजी घ्यावी !
रॅली, सभा किंवा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करताना केवळ गर्दी आणि राजकीय शक्तिप्रदर्शनावर भर न देता कार्यकर्ते व नागरिकांच्या सुरक्षेलाही सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. राजकारण्यांनीही कार्यक्रमाच्या मार्गाची आणि परिसराची पूर्वतपासणी करूनच कार्यकर्त्यांना सहभागी करून घ्यावे. कार्यकर्त्यांच्या जीवाशी खेळ करून कोणताही राजकीय कार्यक्रम यशस्वी ठरू शकत नाही. उत्साहाच्या वातावरणात एखादा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो, याचे भान सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ठेवणे गरजेचे आहे.
मुख्याधिकाऱ्यांकडून दखल
घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजलगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी तातडीने संबंधित यंत्रणेला घटनास्थळी पाठवून विद्युत पुरवठा बंद करण्याच्या सूचना देत असल्याचे सांगितले.