मराठवाडा

बीड : मद्यधुंद कार चालकाच्‍या धडकेत तीन तरुण ठार

अविनाश सुतार

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : मद्यधुंद कार चालकाने घाटनांदुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभ्या असलेल्या चौघांना  चिरडले. दोघांचा घटनास्थळी तर एकाचा लातूर येथे रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी महादेव रामकिसन काटुळे यांनी फिर्याद दिली आहे. तर कारचालक अलिफ शेख बाबुसाब (वय ५७) याला अटक करण्‍यात आली आहे.

वैभव सतीश गिरी (वय २८), लहू बबन काटुळे (वय ३०) हे जागीच ठार झाले. तर गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या रमेश विठ्ठल फुलारी (वय ४७) याचा लातूर येथील खासगी रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास एक कार (एमएच २० व्ही २५१८) अंबाजोगाईकडून भरधाव वेगाने आली. घाटनांदुरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबाला कार धडकली. यानंतर रस्त्यावर उभे असलेल्या चौघांना धडक देऊन जवळपास शंभर मीटर अंतर फरफटत नेले.  हा अपघात एका सीसीटीव्हीत कैद झाला असून रात्री उशिरा त्याचे फुटेज समोर आले आहे. तपास अंबाजोगाई ग्रामीणचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे करीत आहेत.

घाटनांदुर शोककळा !

या घटनेत मृत्यू पावलेले तीनही तरुण हे घाटनांदुर येथील असल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. तीन तरुणांपैकी एकजण रिक्षाचालक, एकजण फुलांचा व्यवसाय करुन तर एकजण इतर किरकोळ उद्योग करुन आपले कुटुंब चालवत होते. तिघेही गावातील सामाजिक कामात सातत्याने सहभागी होत असत. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे घाटनांदुर गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT