गेवराई (जि. बीड), पुढारी वृत्तसेवा : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन (शनीचे) रोडवरील पैठणच्या उजव्या कालव्यात भरधाव वेगातील कार पडली. यामध्ये कारमधील सहा जण जखमी झाले. जखमींना गेवराईचे स्थानिक नागरिकांनी मदतकार्य करुन कारच्या बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. ही घटना आज दुपारी घडली असल्याचे नागरिकांनी सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राक्षसभुवन शनीचे येथे दर्शन करुन औरंगाबाद येथे परत जात असलेली भरधाव वेगातील कार (क्र.MH-20 FY 3302) ही रोडवरील पैठणच्या उजव्या कालव्याजवळ आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने कालव्यात कार कोसळली. यामध्ये कारमधील सहा जण जखमी झाले असून हा अपघात घडला. स्थानिक नागरिकांनी कारमधील जखमींना मदत करत कारच्या बाहेर काढले. तसेच या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले. यानंतर अपघातग्रस्त कार ट्रँक्टरच्या सहाय्याने वर काढण्यात आली होती.
पैठणच्या उजव्या कालव्यात मागील काही दिवसांपासून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे हा कालवा भरुन वाहत होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच या कालव्यातील पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणातून बंद करण्यात आला होता. त्यामुळे कालव्यातील पाणी आज सकाळी कमी झाले होते. दरम्यान आज शनिवारी दुपारी सदरील कालव्यात पडली. अपघातग्रस्तांचे नशीब बलवत्तर म्हणून यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. कालव्यात जर पाणी असते तर यामध्ये मोठी हानी झाली.
हे ही वाचलं का