औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : अज्ञात सहा आरोपींनी मंत्रालयातील निवृत्त उपसचिव विश्वनाथ लक्ष्मणराव राजाळे (वय ६०,रा. सिडको) यांचे शनिवारी (दि.१७) रोजी दुपारी इब्राहिमपूर शिवारातील एका फॉर्म हाउसमधून अपहरण केले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सात तासात ४ आरोपींना अटक करून राजाळे यांची सुटका केली. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वनाथ राजळे हे मंत्रालयातून दोन वर्षांपूर्वी उद्योग उपसचिव पदावरून निवृत्त झाले. ते शनिवारी (दि.१७) दुपारी दोन-अडीचच्या दरम्यान इब्राहिमपूर शिवारातील फॉर्म हाऊसमध्ये होते. यावेळी त्यांच्या फॉर्महाऊस मध्ये एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून ३० ते ३५ वयोगटातील ४ जणांनी फार्म हाऊसमध्ये प्रवेश केला. प्रथम नौकर दीपक भागवत यास चाकूचा धाक दाखवत एका खोलीत कोंडले. त्यानंतर विश्वनाथ राजाळे यांचे अपहरण केले.
घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी वरिष्ठांना माहिती दिली. अपहरण कर्त्यांनी राजाळे यांच्या कुटुंबीयांकडे ३ कोटी ८० लाखाची खंडणी मागितली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी बीड, जालना व नगर मार्गावर नाकाबंदी केली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत राजाळे यांच्या तपासासाठी विविध ठिकाणी पोलिसांचे पथक पाठवले.
मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी विश्वनाथ राजाळे यांची रात्री साडेनऊ वाजणाच्या सुमारास औरंगाबाद-जालना मार्गावर बदनापूर जवळ अपहरण कर्त्यांची गाडी अडवून आरोपीला ताब्यात घेत, विश्वनाथ राजाळे यांची सुटका केली. ही कारवाही यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक पवन बनसोड, उपविभागीय यांनी परिश्रम घेतले.