पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर म्हणाले, "टॅक्स आणि मत लुटण्यासाठी महाराष्ट्र आणि द्यायची वेळ आली तर गुजरात किंवा इतर राज्य..." (Budget 2024 )
देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का?
केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देते
महाराष्ट्रातील उद्योग गुजरात मध्ये पळवणार आणि बजेटमध्ये देखील दुर्लक्ष
महाराष्ट्र आता आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.२३) २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या वेळी त्यांनी विविध घटकांसाठी घोषणा आणि तरतूदी केल्या. विरोधी गटातून अर्थसंकल्पावर टीका करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान विरोधी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी आपल्या सोशल मिडियावर पोस्ट करत म्हटले आहे,
"बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणून बजेट मध्ये या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे.एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला. या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळालं -ठेंगा! देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देते हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरात मध्ये पळवणार आणि बजेट मध्ये देखील महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जात आहे, हे कधीपर्यंत सहन करायचं? टॅक्स आणि मत लुटण्यासाठी महाराष्ट्र आणि द्यायची वेळ आली तर गुजरात किंवा इतर राज्य...महाराष्ट्र आता आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, जनताच याला उत्तर देईल!
केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये (Budget 2024) महाराष्ट्राला दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर निषेध व्यक्त केला. यावेळी खासदारांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.केंद्र सरकारचा निषेध केल्यानंतर बोलताना खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, मला वाटते या अर्थसंकल्पाला 'प्रधानमंत्री सरकार बचाओ योजना' म्हणायला हवे. कारण त्यांना हे कळून चुकलंय की, पुढची ५ वर्षे या सरकारला वाचवायचे असेल, तर त्यांना त्यांच्या साथीदारांची काळजी घ्यावी लागेल. केंद्राकडून महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. (Budget 2024)