Maharashtra Rain Update Pudhari
महाराष्ट्र

Maharashtra Rain Update: मुंबईला ऑरेंज अलर्ट! 24 जूनपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा मोठा इशारा

Maharashtra Rain Update: 15 दिवस रेंगाळल्यानंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची सुरुवात झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Rain Update: राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून रेंगाळलेल्या मान्सूनने अखेर पुन्हा एकदा दमदार एन्ट्री केली आहे. मुंबईसह कोकण आणि राज्यातील अनेक भागांत आज पावसाने दमदार हजेरी लावली. पहाटेपासूनच मुंबईतील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळत असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरांसह अंधेरी, विलेपार्ले, वांद्रे, दादर, वरळी आणि लोअर परळ परिसरात सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. नवी मुंबई आणि ठाणे परिसरातही रिमझिम पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनची वाटचाल संथ झाली होती. साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यभर सक्रिय होणारा मान्सून यावेळी तब्बल 15 ते 17 दिवस उशिरा आला आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र आता पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने आशेचा किरण दिसू लागला आहे.

कोकणातही मान्सूनने पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली आणि कुडाळ परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या सरींमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. विशेषतः भात पिकांच्या रोपांना या पावसाचा फायदा झाला आहे. मात्र जिल्ह्यातील इतर भागांमध्ये अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातही अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुनरागमन केले आहे. वसमत शहरासह ग्रामीण भागात झालेल्या जोरदार सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. तरीही शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या पेरणीलायक पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 24 जूनपासून राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान प्रणाली हळूहळू उत्तरेकडे सरकत असल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये मुसळधार पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. 24 ते 28 जूनदरम्यान अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, एल निनोचा प्रभाव, कोरड्या हवेचे प्रवाह आणि कमी दाबाच्या क्षेत्रांचा अभाव यामुळे मान्सूनचा वेग मंदावला होता. मात्र आता परिस्थितीत बदल होत असून दक्षिण कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

एकूणच, गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला पाऊस आता राज्यात पुन्हा सक्रिय होत असल्याचे चित्र दिसत आहे. आगामी काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाचे लक्ष हवामानाच्या पुढील घडामोडींवर लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT