कोल्हापूर

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील तरुणाचा कळंबा तलावात बुडून मृत्यू

Shambhuraj Pachindre

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

मित्रासमवेत कळंबा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या अनिरुद्ध संभाजी घाटगे (वय 21, रा. शिवाजी पेठ) याचा बुडून मृत्यू झाला. ऐन उमेदीतील मुलाच्या मृत्यूने कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा काळीज कापणारा होता. मनाला चटका लावणार्‍या घटनेमुळे शिवाजी पेठ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी दुपारी हा प्रकार घडला.

सरनाईक कॉलनीतील अनिरुद्ध मित्रासमवेत तपोवन येथे एनसीसीच्या सरावासाठी गेला होता. तेथून पोहण्यासाठी सर्वजण कळंबा तलाव येथे गेले होते. अनिरुद्ध पोहत तलावाच्या मध्यापर्यंत गेला. तेथून परतत असताना त्याला धाप लागली.त्यामुळे तो पाण्यात बुडाला. हा प्रकार मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रयत्न निष्फळ ठरले.

या घटनेनंतर करवीर पोलिस आणि मनपा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले. अनिरुद्धच्या कुटुंबीयांसह नातेवाईकही मोठ्या संख्येने आले. अग्निशमन दलाचे जयवंत खोत, तानाजी कवाळे, प्रमोद मोरे, गणेश टिपुगडेसह रेस्क्यू टीमचे उदय निंबाळकर यांनी यांत्रिकी बोटीद्वारे अनिरुद्धचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

सायंकाळी साडेचारच्या सुमारास तलावातील खोल पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला. कळंबा येथील ग्रामस्थांसह तरुण मंडळाचे कार्यकर्तेही शोधमोहिमेत सहभागी झाले होते. अनिरुद्धच्या मागे आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे.

SCROLL FOR NEXT