Vishalgad Encroachment liberation movement turns violent
विशाळगड : विशाळगड परिसरात असलेला पोलिस बंदोबस्त.  Pudhari File photo
कोल्हापूर

Vishalgad Encroachment : गजापूर अद्यापही भीतीच्या छायेत

पुढारी वृत्तसेवा

विशाळगड : विशाळगड अतिक्रमणमुक्ती आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले. त्याचा मोठा फटका विशाळगडपासून पूर्वेला अडीच किलोमीटरवर गजापुरातील मुस्लिम वसाहतीस बसला. काहीजणांनी वाहने, घरांची तोडफोड व जाळपोळ करून दहशत माजवली. जीवाच्या आकांताने महिला, लहान मुले, पुरुष सैरभैर पळत होते. घटनेला तीन दिवस झाले तरी हा परिसर अजूनही भीतीच्या छायेखाली आहे. जमावबंदी लागू असून परिसरात 200 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.

  • तोडफोड, जाळपोळीमुळे लोकांमध्ये दहशत

  • महिला, लहान मुलांच्या चेहर्‍यावर अजूनही भीती

  • परिसरात जमावबंदी आदेश लागू

विशाळगड अतिक्रमणमुक्त करून त्याचे ऐतिहासिक सौंदर्य व महत्त्व अबाधित राहावे आणि त्याचे जतन, संवर्धन, संरक्षण राष्ट्रीय संपत्ती म्हणून व्हावी, या उद्देशाने विशाळगड मुक्ती आंदोलन संभाजीराजे तसेच विविध संघटनांच्या वतीने पुकारले होते. तत्पूर्वी बेकायदेशीर अतिक्रमणे काढावीत, असा इशाराही दिला होता. मात्र दीड वर्ष होऊनही अतिक्रमणे हटविली गेली नसल्याने रविवारी संभाजीराजे व विविध संघटनांच्या वतीने आंदोलन गडाच्या पायथ्याशी करण्यात आले. या आंदोलनात हजारो लोक सहभागी झाले होते. दरम्यान, गडावर दगडफेक व तलवार हल्ल्याने वातावरण तापले. परिणामी पोलिसांना गड पायथ्याला लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी मज्जाव केल्याने चीड निर्माण होऊन काही आंदोलकांनी पायथ्यापासून रस्त्यावर दगडांची पेरणी करून वाट अडविण्याचा प्रयत्न केला. परिणामी आंदोलकांनी हिंसक वळण घेतले.

गजापुरातील रस्त्यालगतच्या मुसलमानवाडीला टार्गेट करत घरांची, चारचाकी, टू व्हीलर वाहनांची तसेच येथील मशिदीवर हल्ला करून तोडफोड केली; तर काही घरांना आग लावली. यात प्रापंचिक साहित्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. या सार्‍या प्रकारामुळे परिसरात आजही तणावाचे वातावरण आहे. परिसरातील विशाळगड, गड पायथा, पांढरेपाणी, केंबुर्णेवाडी, गजापूर नाका, आंबा येथील नाक्यावर सुमारे 200 पोलिसांचा कडक पोलिस बंदोबस्त तैनात आहे. नागरिकांची कसून चौकशी करून दप्तरी नोंद केल्यानंतरच नागरिकांना सोडले जात आहे. याचा फटका स्थानिकांनाही बसत असल्याने परिसरात भीतीच्या छायेखाली नागरिक वावरत आहेत. मुले भेदरली असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. उघड्यावरच पडलेल्या संसाराला आता मदतीची गरज आहे.

प्रत्येक कुटुंब भेदरलेले

विशाळगड व गजापूर या दरम्यान डोंगराच्या कुशीत साठ कुटुंबांची ही वस्ती असून येथे प्रभुलकर, गोलंदाज, सारवान, गडकरी कुटुंबे मोलमजुरी व किरकोळ व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतात. या घरांतील काही तरुण मुंबई व परदेशात मिळेल ते काम करीत आहेत. अशा वस्तीवर आलेले संकट प्रत्येकाच्या मनात धडकी भरवणारे ठरले. रस्त्यालगत असलेल्या रेश्मा प्रभुलकर यांच्या घर व दुकानाला पेटवून दिल्याने अख्खे कुटुंब हताशपणे बसले आहे. विशाळगड अतिक्रमणाशी आमच्या वस्तीचा काडीचाही संबंध नसताना आम्हाला जमावाने लक्ष्य करून आमचा संसार व उदरनिर्वाहाचे साधन उघड्यावर पाडले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

SCROLL FOR NEXT