कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : Vishalgad Anti Encroachment Protest : विशाळगड अतिक्रमणमुक्तीच्या माजी खासदार संभाजीराजे यांच्या मोहिमेला रविवारी (दि.14) हिंसक वळण लागले. या प्रकरणात माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती शाहुवाडी पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले आहेत. तर इतर २१ संशयितांना अटक करण्यात आली आहे.
गजापूर ते विशाळगड या सुमारे पाच किलोमीटर परिसरात प्रचंड दगडफेक, तोडफोड करण्यात आली. घरे, दुकानांसह मशिदीला लक्ष्य करत आंदोलकांनी हल्लाबोल केला. दुकाने, वाहनांसह काही घरांची जाळपोळ करण्याचाही प्रयत्न झाला. याप्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये 500 हून अधिक जणांवर रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून आणखी नावे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल होणार आहेत. (Vishalgad Encroachment)
दरम्यान, पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहुवाडी पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, जाळपोळ करणे, धार्मिक स्थळांची नासधूस करणे, धार्मिक भावना दुखावणे, दोन गटामध्ये शत्रुत्व वाढविणे, बेकायदेशिर जमाव जमवून शस्त्र बाळगणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, लोकसेवकावर हल्ला करणे, जमावबंदी आदेशाचा भंग करणे अशा विविध कलमान्वये 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता पर्यंत 21 संशयीत आरोपींना व्हीडीओ फुटेजच्या आधारे अटक करण्यात आलेली आहे.
कालच्या घटनेत बंदोबस्तासाठी असणारे निकेश खाटमोडे पाटील (अपर पोलीस अधीक्षक, गडहिग्लज विभाग), अजित टिके (उप विभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग), आपासाो पवार (उप विभागीय पोलीस अधिकारी, शाहुवाडी विभाग), पोलीस निरीक्षक विजय घेरडे, संजिव झाडे, सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक रणजित पाटील, मददसुर शेख, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, अमित पाटील, पोलीस अमंलदार विठ्ठल बहिरम, बालाजी पाटील, रोहित मर्दाने, जगताप हे जमावाला नियंत्रित करत असताना जमावाने केलेल्या दगडफेकीत जखमी झाले आहेत. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींची व्हीडीओ फुटेजच्या माध्यमातून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, असेही पोलीसांनी सांगितले.
घटनेच्या अनुषंगाने कोणीही सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत केल्यास त्यांच्यावरही कायदेशिर कारवाई करण्यात येईल. सोशल मिडीया मॉनिटरिंग सेलच्या माध्यमातून यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.
विशाळगड आणि परिसर या भागात तसेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये योग्य तो बंदोबस्त करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये शांतता आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहनही कोल्हापूर पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.