चंदगड, पुढारी वृत्तसेवा : तिलारी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये भारतीय सैन्य दलातील राजपुताना रायफलच्या जवानांच्या सरावादरम्यान बोट उलटून दोन जवानांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना शनिवारी (दि.7) सायंकाळी तिलारी धरणाच्या बॅक वॉटरच्या हजगोळी परिसरात घडली. विजयकुमार (वय.२८ रा. धानीअशा राजस्थान ) व दिवाकर रॉय (वय.२८, रा. पश्चिम बंगाल ) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
राजपुताना रायफलचे जवान सरावासाठी हजगोळी परिसरातील धरणातील पाण्यात आले होते. एकूण सहा जण बोटीतून सराव करीत असताना अचानक बोट उलटली. यामधील सहाही जण पाण्यात पडले. यामधील चार जवान पोहत काठावर आले. तर विजयकुमार आणि दिवाकर या दोघांच्या पाठीवर मोठे ओझे होते. तसेच दोऱ्या पायात अडकल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. पाण्यात बुडालेले दोन्ही मृतदेह काढण्यात जवानांना यश आले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह चंदगड पोलीस ठाण्यात आणले होते.