कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर - पन्हाळा मार्गावर केर्लीजवळ आलेल्या पाण्याची पातळी वाढल्याने केर्ली-कोतोली फाटा या मार्गावरील वाहतूक जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (दि.२३) दुपारपासून बंद केली. या मार्गावरील वाहतूक केर्ली-जोतिबा रोड, दानेवाडी, वाघबीळ या मार्गे वळवण्यात आली आहे.
कोल्हापूर पन्हाळा मार्गावर केर्ली-कोतोली फाटा दरम्यान मंगळवारी सकाळी कासारी नदीचे पाणी आले. आपत्ती व्यवस्थापनाच्या स्वयंसेवकांच्या मदतीने या मार्गावर दोन्ही बाजूने एकेरी वाहतूक सोडण्यात येत होती. मात्र, दुपारी पाण्याची पातळी सुमारे दीड फुटावर गेली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला.