The struggle against the pollution of the Panchganga River is turning into a life-or-death battle!
शिरढोण/बिरू व्हसपटे : पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणामुळे शिरोळ तालुक्यातील जनजीवन धोक्यात आले असून नदीकाठच्या गावांमध्ये आरोग्य, शेती आणि पशुधनासमोरील संकट अधिक गडद होत आहे. दूषित व विषारी पाण्याचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. प्रदूषण वादावरून एकीकडे जीवन तर दुसरीकडे मरण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे प्रदूषणाविरोधातील संघर्ष ठरतोय जीवन मरणाची लढाई.
औद्योगिक सांडपाणी आणि वाढत्या प्रदूषणामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांना त्वचारोग, पचनविकार, श्वसनाचे त्रास आदी आजारांचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. प्रदूषणाचा परिणाम केवळ मानवी आरोग्यावरच नव्हे, तर शेती आणि पशुधनावरही होत आहे. दूषित पाण्यामुळे जमिनीची सुपीकता घटत असून पिकांचे नुकसान वाढत आहे. जनावरांमध्येही विविध आजारांचे प्रमाण वाढल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
दरम्यान, गेल्या अडीच महिन्यांपासून पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी व्यापक कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. ठोस उपाययोजना झाल्यास आंदोलन मागे घेण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाऊ शकते; अन्यथा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
आंदोलकांच्या मते, हा लढा कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा उद्योगाविरोधातील नसून नदीकाठच्या लोकांचे आरोग्य आणि जीवनमान सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. उद्योग, रोजगार आणि पर्यावरण यांचा समतोल राखत पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी शासन, प्रशासन, उद्योग क्षेत्र आणि नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
शिरोळ तालुक्यातील अनेक गावांचे आरोग्य आणि अर्थकारण पंचगंगा नदीवर अवलंबून आहे. परिसरात कर्करोगासह गंभीर आजारांचे प्रमाण वाढल्याची चर्चा असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ पर्यावरणापुरता मर्यादित नसून हजारो कुटुंबांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि भवितव्याशी संबंधित असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पंचगंगा प्रदूषण : तालुक्यासमोरील गंभीर आव्हान
पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक गावांचे आरोग्य आणि अर्थकारण धोक्यात आले आहे. दूषित पाण्याचा फटका शेती, पशुधन आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला बसत असून विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. प्रदूषणमुक्त पंचगंगा ही काळाची गरज बनली असून या प्रश्नावर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.