आजरा : कृष्णा सावंत
आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान असणारा बहुचर्चित सर्फनाला प्रकल्पात प्रथमच या वर्षीपासून पाणी साठ्याला सुरवात झाली आहे. पूनर्वसनाचे काम पूर्णत्वाकडे आल्याने पारपोली गाव संपूर्ण पाण्याखाली जाणार नाही, याची काळजी घेत पहिल्यावर्षीच शनिवारी (दि.20) सायंकाळी साडे चार वाजता प्रकल्पात 66 टक्के पाणीसाठा भरून ओव्हर फ्लो झाल्याने शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.
या प्रकल्पामूळे पारपोली येथील 250 कुटुंब विस्थापित होणार आहेत. या कुटुंबांच्या घरबांधणीचे काम शेळप व देवर्डे येथील हद्दीत युद्धपातळीवर सुरू आहे. यावर्षीपासून पेरणोली, देवर्डे, गवसे, शेळप, कोरीवडे, देवकांडगाव, हरपवडे, साळगाव, सोहाळे, सुलगाव, चांदेवाडी आदी गावातील एकूण 1600 हेक्टर जमीन लाभक्षेत्राखाली येणार आहे. यावर्षीच्या पावसाळ्यानंतर बारा महिने पाणीसाठा हिरण्यकेशी नदीत राहणार आहे.