कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा : गतवर्षीच्या गळीत हंगामात तुटलेल्या ऊसाला प्रतिटन ४०० रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता द्यावा, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुणे बंगळूर महामार्गावर रास्तारोको करत एल्गार सुरु केला आहे. यामुळे महामार्गावरून जाणारी वाहने कोल्हापूर शहरातून कसबा बावडा मार्गे वळवण्यात आली आहेत. या कारणाने कसबा बावडा मुख्य मार्गावर वाहनांची प्रचंड कोंडी होऊन दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कसबा बावडा मुख्य मार्गावर उशिरापर्यंत ही परिस्थिती कायम होती.
गतवर्षीच्या हंगामात तुटलेल्या ऊसाला ४०० रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यापासून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनापूर्वी साखर कारखाना प्रतिनिधी आणि शेतकरी संघटना यांच्यात चर्चा झाल्या. पण चर्चेतून कोणताही मार्ग निघाला नसल्यामुळे गुरुवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करत एल्गार करण्यात आला.
सकाळी दहा वाजल्यानंतर हायवेवरील वाहतूक ताराराणी चौक, धैर्यप्रसाद चौक, जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय येथून कसबा बावडा मार्गे वळविण्यात आली. दुसरीकडे शिये येथून हायवेवरील वाहतूक कसबा बावडा मार्गे वळविण्यात आली. दोन्ही बाजूने अवजड वाहनांसह प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात कसबा बावडा मुख्य मार्गावरून सुरू झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. शहर वाहतूक कार्यालयाचे पोलीस वाहतुकीचे नियोजन करत होते.
हेही वाचा :