Shirol Nrusinghwadi Traffic Issue
नृसिंहवाडी : नृसिंहवाडी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस लक्षणीयरीत्या वाढत आहे. मात्र, या वाढत्या गर्दीसोबतच येथील वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच बनली आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि अपुऱ्या उपाययोजनांमुळे मुख्य मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून संपूर्ण परिसराला वाहतूक कोंडीचा मोठा विळखा पडत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
नृसिंहवाडी हे प्रमुख दत्तक्षेत्र असल्याने येथे महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि आंध्रप्रदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. गुरुवार, पौर्णिमा आणि सुट्ट्यांच्या दिवशी तर ही गर्दी दुप्पट होते. मात्र इतक्या मोठ्या गर्दीचे नियंत्रण करण्यास प्रशासनास अपयश येत असल्याचे चित्र आहे. गर्दीच्या प्रत्येक दिवशी शिरोळ, नृसिंहवाडी, कुरुंदवाड या राज्यमार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.
गावातील पार्किंगची क्षमता संपल्यावर स्वागत कमानीपासून वाहनांना प्रवेश दिला जात नाही. पाटील महाराज मठ, जगदाळे प्लॉट, कॉलेज परिसरात पर्यायी पार्किंग करण्यात येते. मात्र तरीही भाविकांची वाहने राज्यमार्गाच्या दुतर्फा लागून राहत असल्याने ट्रॅफिक जॅमची समस्या उद्भवत आहे. येथे स्वतंत्र वाहतूक कक्ष सुरू करून वाहतूक नियंत्रकांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.
गर्दी लाखोंची.. पोलिस मात्र दोनच!
अधिक महिन्यातील सुट्ट्यांच्या निमित्ताने दररोज लाखोंची गर्दी नृसिंहवाडीत होत आहे. मात्र शिरोळ पोलिस ठाण्याकडून वाहतुकीच्या बंदोबस्तासाठी केवळ दोनच पोलिस दिले जातात. गर्दीत चोरी, पाकिटमारी, मिसिंगच्या अनेक घटना घडतात; मात्र याकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. पोलिस दूरक्षेत्राची अवस्थाही बिकट असून बीट अंमलदार उपस्थित नसल्याच्या तक्रारी आहेत.