कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास विरोध नाही. मात्र, आंदोलन सुरू झाल्यानंतर सरकारने आश्वासन दिले, नंतर आदेश दिला. यापूर्वीचे सरकारने हे का केले नाही, हिंसाचार घडायची वाट पाहत होते का, असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी केला. हे प्रशासनाचे अपयश असल्याची टीका करत कोल्हापूरला टार्गेट केले जात आहे, अशा दंगली घडविण्यामागे काय उद्देश आहे, अशी विचारणाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
आ. पाटील म्हणाले, अतिक्रमण काढण्यासाठी न्यायालयात सरकारने किती प्रयत्न केले. हे प्रकरण भिजवत ठेवण्याचे आणि गैरप्रकार करण्याचे प्रयत्न केले जात होते का? राजर्षी शाहूंचा विचार देशभर जात आहे. यामुळे कोल्हापूरला टार्गेट केले जात आहे. गेल्या वर्षभरात राज्यात अशा 50 ते 52 घटना घडल्या आहेत, तारीख आणि स्थळवार याची माहिती देता येईल, अशा दंगली घडविण्यामागे काय उद्देश आहे, असा सवालही त्यांनी केला.
संभाजीराजे यांनी थोडा विचार करून भूमिका घ्यायला पाहिजे होती, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यायला पाहिजे होती, असे सांगत आ. पाटील म्हणाले, आम्ही उद्या लोकांना दिलासा देण्यासाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी जाणार आहोत. प्रशासनाने रविवारी बंदोबस्त ठेवला नाही, आता बंदोबस्ताचे नाटक करू, नये असे सुनावले.