Chhatrapati Sambhaji Raje said to Minister Hasan Mushrif
विशालगडच्या प्रश्नावरून संभाजीराजे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. Pudhari File Photo
कोल्हापूर

Vishalgad Encroachment : पालकमंत्री मुश्रीफ यांनी आम्हाला पुरोगामित्व शिकवू नये : संभाजीराजे

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ माझे पुरोगामीत्व काढत आहेत. मुश्रीफ मला कोट करून पुरोगामित्व शिकवत आहेत. मुश्रीफ हे शाहू, फुले आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारणात आले असून त्यांनी स्वतःच्या पुराेगामीत्वाचे आत्मचिंतन करावे. विशाळगडावरील विषय न्याय प्रविष्ठ नसताना तुम्हाला कोणी सांगितले तो न्याय प्रविष्ठ आहे. मग आज अतिक्रमण काढण्यासाठी परवानगी कशी मिळाली? पालकमंत्र्यांनी मला कोट करून बेजबाबदारपणे बोलू नये. राजर्षी शाहू महाराजांचे पुरोगामित्व मला शिकवू नये. त्यांच्या घराण्यात माझा जन्म झाला आहे. अशा शब्दात संभाजीराजे यांनी मंत्री मुश्रीफ यांना सोमवारी सर्किट हॉऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सुनावले.

संभाजीराजे म्हणाले, विशाळगड, गजापूर येथे घडलेल्या घटनेचे मी समर्थन करत नाही. पण हे घडलं का ? याची कारणे तरी शोधली पाहिजेत.अनेक दशके शिवभक्त विशाळगडावरील अतिक्रमणमुक्तीसाठी प्रयत्न करत आहेत. चार वर्षापूर्वी माझ्यासह शिवभक्तांनी विशाळगडची पाहणी केली. तेथे अतिक्रमण, मद्यपान, पशुहत्या अशी महाभयानक परिस्थिती दिसली. विशाळगड किल्ला पुरातत्व विभागाकडे आहे, असे असताना देखील सरकारनेही अतिक्रमण केले आहे. अनेकांना राहण्यासाठी परवानगी दिली. मग हे काढणार कोण ? म्हणून दीड वर्षापासून तेथील अतिक्रमण काढण्यासाठी मी सरकारच्या मागे आहे. पण एका लोकप्रतिनिधींने त्याला खो घातल्याने हा विषय कोर्टात गेला.

त्यानंतर सर्वांनी विशाळगडावरील अतिक्रमण न्याय प्रविष्ठ असल्याचा भ्रम निर्माण केला. १५८ अतिक्रमणे सिद्ध झाली असून तेथील लोकांनी ती मान्य केली आहेत. फक्त ६ व ७ हेच कोर्टात आहेत. उर्वरित अतिक्रमणे न्याय प्रविष्ठ नाहीत. गडाच्या पायथ्याला गाळे आहेत. त्यातील एकच व्यक्ती न्यायालयात गेला आहे. मग अन्य व्यक्तींची अतिक्रमणे का काढली नाहीत, असे संभाजीराजे म्हणाले. शिवभक्तांच्या आक्रोशानंतर आता अतिक्रमणे काढण्याचा सरकारने निर्णय घेतला. हा निर्णय या अगोदर घेऊ शकत होता. मग दीड वर्षात ही अतिक्रमणे का काढली नाहीत, असा प्रश्नही संभाजीराजेंनी सरकारला केला आहे.

यासीन भटकळ हा अतिरेकी आहे. भारतात महत्त्वाच्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाचा तो म्होरक्या आहे. तो विशाळगडावर रहायला होता याची नोंद आहे. तेव्हा हे महाशय कोठे होते. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी धाडसी निर्णय घेतला. त्यामुळेच विशाळगडावर पशुहत्या बंदी झाली आणि अतिक्रमणे काढण्यास सुरूवात झाली होती. नंतर ती का बंद झाली. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावाला प्रशासन बळी पडले. त्यामुळे पुढील कारवाई थांबल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

पत्रकार बैठकीला धनंजय जाधव, अंकुश कदम, स्वराज्य पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय पवार, फत्तेसिंह सावंत, हेमंत साळोखे, सुखदेव गिरी, प्रविण पोवार, माधवराव देवसरकर, सदा पाटील, धनंजय खाडे, धनाजी खोत, अमर पाटील यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

गडकोटांच्या कामात अडथळे, काम थांबवतो

आजपर्यंत माझे गड कोटांसाठी प्रामाणिक काम चालू आहे. गडकोट संवर्धनासाठी तुम्ही किती पैसे दिलेत. पाच कोटींचा निधी विशाळगड संवर्धनासाठी दिला.रांगणा,रायगड किल्यांसाठी निधी दिला. हे मंत्री मुश्रीफ यांना दिसत नाही.गडकोटावरील अतिक्रमणे काढण्यासाठी प्रयत्न करायला नकोत का? मी प्रामाणिकपणे काम करत आलो आहे.कोणत्याही कामात कमीशन देत नाही. गडकोटांचे काम करताना मलाच ऐवढे अडथळे येत आहेत. कोल्हापूरकरांना आणि नेत्यांना मी नको असेल तर गडकोटांचे काम थांबवितो. मी कोणत्याही पक्षात नाही अजून राजकारण शिकतोय. शाहू महाराज माझे वडील आहेत म्हणून त्यांचा लोकसभा निवडणूकीत प्रचार केल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

मंत्री मुश्रीफांसह नेत्यांना अतिक्रमण दिसत नाही का?

पालकमंत्री मुश्रीफांसह जिल्ह्यातील नेत्यांना विशाळगडावरील अतिक्रमण दिसत नाही का?, याचे सरकारला आणि प्रशासनाला गांभीर्य नाही. शिवभक्तांमध्ये आक्रोश आहे आणि ते विशाळगडावर येणार आहेत. हे त्यांना माहिती होतं. मग तुम्ही यंत्रणा का लावली नाही.ज्या विशाळगडाने छत्रपती शिवरायांना संरक्षण दिले. विशाळगड मराठ्यांची राजधानी आहे.तेथे गल्लीच्छपणा चालतो. आणि तो तुम्ही सहन करू शकता का? असा सवालही संभाजीराजेंनी उपस्थित केला.

संभाजीराजेंचे पत्रकार बैठकीतील मुद्दे

  • भीमा कोरेगाव प्रश्न निर्माण झाला तेव्हा का बोलला नाहीत.

  • संसद भवनात राजर्षी शाहू महाराजांची जयंती आम्ही सुरू केली

  • गजापूरातील घटना का घडली याचा शोध घ्या.

  • पालकमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले नाही.

  • प्रशासनाला हात झटकता येणार नाहीत.

  • सरकार आणि प्रशासनाच्या मनात काय होत मला माहिती नाही

  • नेते गडकोटांवर बोलत नाहीत, फक्त मतांसाठी वापर

  • गडकोटांमध्ये माझा कोणताही स्वार्थ नाही

  • २५ किल्ले दत्तक द्या, निधी उभारून संवर्धन करतो.

  • मी कोणत्याही पक्षात नाही, राजकारण शिकतोय.

  • प्रशासकीय बैठकीतून काय निष्पन्न होणार होते ?

SCROLL FOR NEXT