Kolhapur Rain Radhanagari Dam 80 percent full
राधानगरी : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जुलै महिन्यांच्या पहिल्या आठवड्यातच धरण 80 टक्के भरले आहे. पाणी सात स्वयंचलित दरवाज्याजवळ पोहोचले आहे. मे महिन्यातच धरणात भरपूर जलसाठा झाल्याने यंदा धरण लवकर भरले आहे.
यापूर्वी कधीही एवढ्या लवकर धरण भरल्याची नोंद नाही. धरणातून 3100 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. सोमवारी (दि.७) सकाळी संपलेल्या चोवीस तासांमध्ये 89 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर जूनपासून आजअखेर 2234 मि.मी. पाऊस झाला आहे.
मे महिन्याच्या 20 तारखेला पावसाने दमदार सुरुवात केली. धरणामध्ये पाणीसाठा शिल्लक राहिला. त्यामुळे पंचगंगा नदीतील कोल्हापुरी बंधाऱ्यातील बरगे काढण्यास अडचण निर्माण झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये बरगे काढून धरणातून २५०० क्युसेक विसर्ग चालू केला. धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.
पावसाचा अंदाज घेत विसर्ग वाढवला असून सध्या धरणातून 3100 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. शेतकऱ्यांसाठी ही बाब विशेषतः सकारात्मक असून, खरीप हंगामासाठी सिंचनासाठी भरपूर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. धरणातून जलविद्युत निर्मितीही केली जाते. त्यामुळे आगामी काळात वीज उपलब्धतेत वाढ होणार आहे.