प्रा. उत्तम वडिंगेकर
कासारवाडी : हातकणंगले तालुक्यातील ५५ गावात ९ हजार ९१९ पात्र लाभार्थ्यांची निवड प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) सर्वेक्षण २०२४ अंतर्गत जाहीर झाल्या. या घरकुल प्रतीक्षा यादीवरून हातकणंगले तालुक्यातील गावागावांत वादाची ठिणगी पडली आहे.
यादीत नाव समाविष्ट करण्यासह पात्र-अपात्र ठरविण्याच्या निकषांवरून लाभार्थी आणि ग्रामपंचायत यांच्यात जोरदार खडाजंगी होत आहेत. काही ठिकाणी वादावादी व धक्काबुक्कीचे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे घरकुलाच्या यादीने ग्रामीण राजकारण चांगलेच तापले आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच यादी ग्रामपंचायतीत ऑनलाईन आल्यानंतर ग्रामसभांमध्ये या यादीवर वाचन करण्यात आले. यावेळी ‘पात्र असूनही यादीत नाव का नाही?’ आणि ‘आमचे नाव यादीतून कसे वगळले?’ या प्रश्नांवरून अनेक गावांतील नागरिक ग्रामपंचायतीतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना जबाबदार धरले जात आहे. मात्र सर्वेक्षण यादी ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली असल्याने सरपंच, सदस्य मात्र अडचणीत सापडल्याने आता वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबत धाव घेत आहेत. दरम्यान, वाढता असंतोष लक्षात घेता पंचायत समिती आणि जिल्हा प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायतींमध्ये वाढला तणाव
सर्वेक्षणातील त्रुटी आणि पात्रता निश्चितीबाबत पुरेशी माहिती उपलब्ध होत नसल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी मात्र यामुळे अडचणीत सापडले आहेत. संतप्त नागरिकांकडून सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांना जाब विचारला जात आहे. काही ठिकाणी वाद वाढून धक्काबुक्कीपर्यंत प्रकार गेले.
घरकुल यादीचा सर्वे ऑनलाईन असल्यामुळे काही अडचणीमुळे पात्र नागरिकांची यादीत नावे आली नसली तरी ग्रामसभेत ठराव करुन पात्र नाव शासनाला पाठवून अपिल करु शकतात. ग्रामपंचायत सदस्य पात्र असतील तर त्यांची नावे यादीत येऊ शकतात.दिग्विजय जाधव (विस्तार अधिकारी सांख्यिकी, हातकणंगले)
प्रतिक्रिया; घरकुलच्या झालेल्या सर्वेमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग नव्हता. या यादींचे पुनर्परीक्षण करण्यात यावेअच्युत खोत (लोकनियुक्त सरपंच, कासारवाडी)