Pandhrepani Vishalgad Traffic Jam
विशाळगड : शाहुवाडी तालुक्याला पावसानं झोडपून काढले आहे. पांढरेपाणी-विशाळगड मार्गावरील पांढरेपाणी येथे झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे सोमवारी (दि.६) सकाळी सातच्या दरम्यान रस्त्याच्या मधोमध झाड कोसळल्याने तब्बल चार तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामध्ये शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
पांढरेपाणी-विशाळगड मार्गावर परिसरात झालेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरील मोठी झाडे उन्मळून पडली. यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले.
याचा सर्वाधिक फटका शाळेत जाणाऱ्या-येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना आणि कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसला. वाहतूक ठप्प झाल्याने पावसात आणि वादळात लहान मुलांना तासनतास गाडीतच किंवा रस्त्याकडेला अडकून पडावे लागले.
या घटनेनंतर प्रवाशांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. या मार्गावर अनेक वटलेली (वाळलेली) आणि धोकादायक झाडे आहेत, जी कधीही कोसळू शकतात. ही वटलेली झाडे संबंधित विभागाने तात्काळ तोडून टाकावीत, जेणेकरून भविष्यात होणारे मोठे अपघात आणि वाहतूक कोंडी टाळता येईल, अशी आग्रही मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
नयनरम्य निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या आणि पर्यटकांची अखंड मांदियाळी असलेल्या नागमोडी वळणाच्या केंबुर्णेवाडी घाटात दरड कोसळल्याने दगड व मातीचा थर रस्त्यावर आला आहे. सुदैवाने ही घटना रात्री घडल्याने एक मोठा आणि भीषण अनर्थ टळला आहे. ऐतिहासिक विशाळगडाला जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने सध्या वाहतुकीचा खोळंबा झाला असून, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन धोकादायक प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने त्वरित ढिगारा हटवून हा मार्ग सुरक्षित करावा, अशी आर्त साद पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमधून घातली जात आहे.