बांबवडे (कोल्हापूर) : १९९४ च्या टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले सात वेळा ऑल इंडिया आणि तितक्याच वेळा महाराष्ट्र चॅम्पियन पदक प्राप्त केलेले शाहूवाडी तालुक्यातील रेठरे गावचे नामवंत मल्ल पैलवान बंडा पाटील रेठरेकर हे आजारी आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांपासून त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत. परंतु, घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे हे उपचार करणे नातेवाईकांना शक्य नाही. अशा नामवंत पैलवानास मदतीची गरज असून सरकार आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी कुस्ती क्षेत्रातून होत आहे.
ऑलिम्पिक पदाचा मान पटकावलेल्या या कुस्तीवीराचा सकाळी उठणे, हातात विळा, दोरी घेऊन शेतात काम करणे असा नित्यक्रम. पण मनात मात्र कुस्तीला जपणे असं ब्रीद घेऊन वयाच्या ८३ वर्षापर्यंत वाटचाल करणाऱ्या या कुस्तीवीराला आज खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे.
कधीही कोणतीही अपेक्षा त्यांनी न ठेवता बंडा पाटील मामा हे प्रत्येक गावच्या कुस्ती मैदानात आवर्जून उपस्थित राहायचे. मात्र आता प्रकृती साथ देत नसल्याने अंथरुणावर खिळून असलेल्या कुस्ती सम्राटाला मदतीचा हात हवाय. आज कुटुंबीय , तसेच त्यांचे हितचिंतक त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना करत आहेत. सरकारने आणि लोकप्रतिनिधींनी याची दखल घेत त्यांना मदत करावी, अशी मागणी होतेय.