कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा
शिरोळ तालुक्यातील (Kolhapur) अकिवाट बस्तवाड दरम्यानच्या कृष्णा नदीच्या (Krishna River) पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली होती. त्यामुळे वेगवान पुराच्या पाण्यात 7 ते 8 पडले होते. यातील सुहास पाटील, रोहिदास माने हे अकिवाटकडे पाण्यातून पोहत आले. त्यांना धाप लागल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर तंटामुक्त अध्यक्ष श्रेणिक चौगुले, अरुण कोथळे, सागर माने हे नदीपलीकडे बसवाड हद्दीत पोहत जाऊन ते सुखरूप पोहोचले आहेत.
तर माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार आणि अण्णासाहेब हसुरे हे राजापूर बंधाऱ्याच्या दिशेने वाहत गेले असून शार्दूल रजपूत यांच्या मळीतील एका झाडाला ते पकडून थांबले असल्याचे समजते. एनडीआरएफची टीम त्यांना रेस्क्यू करण्यासाठी जात आहे.
सुखरूप सहा जणांना 108 ॲम्बुलन्सने दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अकीवाट येथे घटनास्थळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर सपोनी रविराज फडणीस नायब तहसीलदार योगेश जमदाडे गटविकास अधिकारी नारायण घोलप ग्राम विकास अधिकारी नंदकुमार निर्मळे सह आपत्ती व्यवस्थापन चे पदाधिकारी दाखल झाले आहेत.