यड्राव : इचलकरंजीतील अल्पवयीन मुलाचा शहापूर येथे खून झाल्याची घटना आज (दि.४) उघडकीस आली आहे. सुशांत दीपक कांबळे (वय १७, रा. आसरा नगर) असे मृत मुलाचे नाव आहे. सुशांतच्या चेहऱ्यावर, पाठीत आणि शरीरावर दहा ते पंधरा धारदार शस्त्राचे वार आहेत. जुन्या वादातून मित्रांनीच त्याचा खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे, निरीक्षक सचिन सूर्यवंशी, उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पाहणी केली.
सुशांत आसरानगरमध्ये भाऊ व आईसोबत राहत होता. त्याला घोडागाडी व बैलगाडी शर्यतीचा नाद होता. शर्यतीच्या कारणावरून त्याचे वाद होते. बुधवारी रात्री मित्राला भेटून येतो असे सांगून तो घरातून निघून गेला, तो घरी परतलाच नाही. शहापूर येथील राजीव गांधी विद्यामंदिर या प्राथमिक शाळेच्या पाठीमागे सुशांत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राचे वार होते. सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांनी कोणीतरी पडले असल्याचे पाहिले. जवळ गेल्यानंतर तो खून असल्याचे समजताच याबाबतची माहिती शहापूर पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खूनाची माहिती घेतली.
परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सुशांतच्या मृतदेहा शेजारी मोबाईल पडला होता. तो डिस्चार्ज झाल्यामुळे त्याची लवकर ओळख पटवणे अवघड झाले. मोबाईल चार्ज केल्यानंतर सदरचा मोबाईलवरून कॉल केल्यानंतर तो भावाला लागला. त्यानुसार मृत व्यक्ती सुशांत असल्याची ओळख पटली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. यावेळी सुशांतचे मित्र व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. सुशांतचा मृतदेह पाहून आईने हंबरडा फोडला होता. दरम्यान संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली असून संशयितांना ताब्यात घेतले असल्याचे समजते.