Shirol Shirdhon Gramsabha PUDHARI
कोल्हापूर

Kolhapur News | शिरढोणमध्ये ‘टक्केवारी’च्या आरोपावरून ग्रामसभा गाजली

जलजीवन योजनेवरून ग्रामस्थ आक्रमक; रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Shirol Shirdhon Gramsabha

शिरढोण : शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथे सोमवारी (दि.७) झालेल्या गावसभेत जलजीवन योजनेच्या कामासाठी ‘टक्केवारी’ची मागणी झाल्याच्या आरोपावरून जोरदार गदारोळ झाला. घरकुलांसह विविध विषयांवर आयोजित या सभेत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत, विकासकामांना जाणीवपूर्वक अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करावी आणि गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडलेली जलजीवन योजना तातडीने मार्गी लावावी, अशी एकमुखी मागणी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक दीपक कामत होते.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पोपटराव पुजारी यांनी केवळ ‘टक्केवारी’साठी काहीजण जलजीवन योजनेच्या कामाच्या आड येत असल्याचा आरोप केला. पैशांची मागणी केल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला. विकासकामांना जाणीवपूर्वक अडथळा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

जलजीवन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे तसेच बेकायदेशीर असल्याच्या कारणावरून साडेतीन वर्षांपासून रखडले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि वॉलचंद महाविद्यालयाच्या समितीमार्फत झालेल्या कामाचे ऑडिट करून उर्वरित कामाला गती द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

दरम्यान, पोलिस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील गणेश मंडळांनी मिरवणूक मार्गावर स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच प्रशासक म्हणून नियुक्ती होताच तातडीने गावसभा घेतल्याबद्दल विस्तार अधिकारी दीपक कामत यांचा सत्कार करण्यात आला.

सभेत गावातील रस्ते, सांडपाणी प्रकल्प तसेच पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. मंजूर घरकुलांसह विविध विषयांना सभेने मंजुरी दिली. ऐनवेळच्या विषयावरून ग्रामसेवक विराज जथ्थे यांना ग्रामस्थांनी प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले. मात्र, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिल्यानंतर सभेतील वातावरण निवळले.

यावेळी विश्वास बालीघाटे, सुरेश सासणे, शाहीर बाणदार, अजिंक्य चौगुले, प्रमोद कांबळे, बाबू हेरवाडे, जब्बार नालबंद, अरविंद सासणे, विश्वास शिंगे यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रखडलेल्या योजनेला ‘टक्केवारी’ची किनार!

शिरढोणमधील जलजीवन योजनेच्या कामासाठी ‘टक्केवारी’ची मागणी झाल्याचा आरोप गावसभेत करण्यात आला. पैशांच्या मागणीचे पुरावे असल्याच्या दाव्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. या आरोपांची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, गावासमोर सत्य मांडावे आणि साडेतीन वर्षांपासून रखडलेले जलजीवन योजनेचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT