Shahuwadi Kasari Dam Water Level
सुभाष पाटील
विशाळगड : रखरखत्या उन्हाच्या झळा तीव्र होत असतानाच शाहूवाडी आणि पन्हाळा या दोन्ही तालुक्यांची 'जीवनवाहिनी' असलेल्या कासारी (गेळवडे) मध्यम प्रकल्पासह परिसरातील सहा लघु प्रकल्पांमध्ये १८ मार्चअखेर समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. कासारी धरणात सध्या ६२.१९ टक्के (१.७१ टीएमसी) पाणीसाठा असून, आगामी पावसाळ्यापर्यंत शेती आणि पिण्याच्या पाण्याचे संकट टळल्याचे चित्र आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कालवा निरीक्षक आय जी नाकाडे यांनी दिली.
विशाळगड परिसरातील कासारी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातून शाहूवाडीतील २१ आणि पन्हाळ्यातील ४१ गावांना संजीवनी मिळते. सुमारे ९,४५८ हेक्टर क्षेत्र या प्रकल्पामुळे ओलिताखाली आले असून, नदीवरील १४ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमुळे शेतीला मुबलक पाणी मिळत आहे. कासारी प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता २.७७ टीएमसी आहे. गतवर्षी धरण १०० टक्के ओव्हर फ्लो झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा केवळ १ टक्क्याने कमी असला, तरी पाटबंधारे विभागाने केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे जूनअखेरपर्यंत पाणीटंचाई भासणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
' थेंब-थेंब वाचवा! '
"यंदा पावसाळ्यात धरण १०० टक्के भरल्याने पाणी नियोजनाचे गणित जुळून आले आहे. शेती आणि पिण्यासाठी पुरेसा साठा असला तरीही, भविष्यातील गरज ओळखून शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा," असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. धरणातील या 'जलसमृद्धी'मुळे बळीराजासह सामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून उन्हाळ्याची चिंता मिटली आहे.
कुंभवडे : ६५ टक्के
पडसाळी : ५० टक्के
पोंबरे : ५५ टक्के
नांदारी : ४० टक्के
केसरकरवाडी : ४५ टक्के
सोनुर्ले : ५५ टक्के