कासारवाडी : पुढारी वृत्तसेवा: सादळे मादळे, कासारवाडी येथील रब्बी हंगामातील पीक गव्यांच्या काळपाकडून फस्त होत आहेत. याकडे शेतकरी मात्र हतबल होऊन पाहण्यापलीकडे काही करू शकत नाही. वन विभाग पंचनामे करून नाममात्र तुटपुंजी मदत जाहीर करते.
आज (दि.९) सकाळी आठच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिराच्या पूर्वेला पायथ्याशी व हॉटेल ग्रीन व्हॅली जवळील शेत पिकात सुमारे २० गव्यांच्या एका कळपाकडून ज्वारी, गहू पीक फस्त केले. हाकलण्यासाठी काही शेतकरी जमले. पण यातून काही विपरीत घडायला नको, म्हणून या कळपाच्या पुढे जायला कोणी तयार नव्हते.
या परिसरात रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा पिकांत रात्री व दिवसाही २० गव्यांचा कळप धुडगूस घालत आहे. शेतकरी हतबल होऊन पाहत आहे. वन विभागाला कळवले असता वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी पंचनामा करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवतात. यातून मिळणारी मदत काही वेळा मिळते, तर काही वेळा कित्येक महिने ही मदत मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या पुढे आपले कुटुंब कसे चालवायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्वारी सारख्या पिक शेतकरी जनावरांना चारा म्हणून घेतात. पण हा चारा देखील शेतकऱ्यांना मिळेनासा झाला आहे.