Kolhapur Ratnagiri Road Widening Project
सुभाष पाटील
विशाळगड : कोकण व घाट यांचा दुवा साधणाऱ्या कोल्हापूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावरील जुळेवाडी खिंड-मलकापूर-आंबा दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असले, तरी कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे संपूर्ण परिसरात 'धुळीचे साम्राज्य' पसरले आहे. या जीवघेण्या धुळीमुळे प्रवाशांचा श्वास गुदमरत असून, परिसरातील गावांमध्ये श्वसनाचे विकार बळावल्याने संताप व्यक्त होत आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या आंबा ते मलकापूर दरम्यान जोरात सुरू आहे. चौपदरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि मातीचे भराव टाकले जात आहेत. अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे ही माती हवेत उडून परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना श्वास घेणेही कठीण झाले असून, समोरचा रस्ता न दिसल्याने अपघाताची भीतीही व्यक्त होत आहे. रस्त्यालगतच्या घरांवर, झाडांवर आणि दुकानांवर धुळीचे जाड थर साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या गंभीर समस्येवर उपाय म्हणून रस्त्यावर नियमितपणे पाणी मारणे आवश्यक असताना, संबंधित यंत्रणेकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवाशांतून केली जात आहे.
विकास हवा, पण तो विनाशाच्या वाटेवर नसावा. आंबा ते मलकापूर दरम्यान सुरू असलेल्या रस्ते विकासकामामुळे सध्या प्रवाशांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.— एस. डी. वारंग (करुंगळे)
धुळीमुळे दृश्यमानता शून्य होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. केवळ रस्ता करणे महत्त्वाचे नसून, कामादरम्यान होणारे प्रदूषण रोखणे ही कंत्राटदाराची नैतिक जबाबदारी आहे. यावर तातडीने तोडगा निघायला हवा.— एम आर पालकर ( प्रवासी)
प्रवासाचा आनंद तर सोडाच, एक मिनिटही खिडकी उघडता येत नाही. संपूर्ण चेहरा आणि कपडे धुळीने माखतात. साधी शिंक आली तरी धूळ बाहेर येते.- संजय कदम (बस प्रवासी, साखरपा)