

आशिष शिंदे
कोल्हापूर : झाडांची बेसुमार कत्तल, प्रदूषणाचा कहर आणि हवामान बदलाचे संकट कोल्हापूरभोवती घोंगावत आहे. दिवसागणिक हवामान बदलाची झळ तीव्र होत चालली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या 17 वर्षांच्या विस्तृत हवामान विश्लेषणानुसार, कोल्हापूरचा हवामान बदल तीव्रता निर्देशांक (क्लायमेट चेंज सिव्हॅरिटी स्कोअर) 57 वर पोहोचला असून, जिल्ह्याची गणना आता उच्च धोका (हायसिव्हिॅरिटी) श्रेणीत झाली आहे. परिणामी, कोल्हापूरात ऋतुमानाचा पॅटर्न बदलत आहे व हवामान लहरी होत चालले आहे.
एक्यूआय या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार या कालावधीत तापमान, वार्षिक पर्जन्यमान प्रमाणात सुमारे 29.7 टक्क्यांनी घट झाली असून, आर्द्रतेत 5.9 टक्क्यांची वाढ झाली आहे. ऐतिहासिक सरासरीनुसार वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात स्वच्छ सूर्यप्रकाश असणारे 49 दिवस असत, मात्र 2026 मध्ये हे प्रमाण 42 दिवसांवर आले आहे. याउलट, ढगाळ हवामानाच्या दिवसांत वाढ झाली आहे.
16 वर्षांत प्रदूषणात 177 टक्क्यांची वाढ
कोल्हापुरात सूक्ष्म धूलिकण (पीएम 2.5) पातळीत 2010 च्या तुलनेत तब्बल 177 टक्क्यांची वाढ झाली असून 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ अतिधोकादायक मानली जाते.
क्लायमेट चेंज सिव्हॅरिटी स्कोअर
क्लायमेट चेंज सिव्हॅरिटी स्कोअर म्हणजे एखाद्या शहराच्या हवामानात (तापमान, पाऊस, प्रदूषण) गेल्या काही वर्षांत झालेली नकारात्मक बदल मोजण्याचे एक शास्त्रीय माप.