गंगानगर: पुढारी वृत्तसेवा : येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखाना लिज युनिट श्री रेणुका शुगर्स लि. या कारखान्यात चालू गळित हंगामापासून दररोज ७५०० मे. टनाने गाळप होणार असून, यावर्षी १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. चालू गळीत हंगामासाठी १७ हजार हेक्टर उसाची नोंद झाली आहे. कारखान्याने प्रतिवर्षी उच्चांकी दराची परंपरा राखली असून ऊस उत्पादक शेतकरी व सभासद यांनी आपला नोंदलेला सर्व ऊस कारखान्याकडे गळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन पी. एम. पाटील यांनी केले.
कारखान्याचा सन २०२२-२०२३ या सालचा ६५ वा गळीत हंगाम शुभारंभ मंगळवारी पी. एम. पाटील व संचालकांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. संचालक महादेव पाटील व त्यांच्या पत्नी पुष्पा पाटील यांच्या हस्ते ऊस वजनकाटा पूजन व उसाने भरलेल्या बैलगाडीचे विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर ऊसमोळीचे पूजन करुन ती गव्हाणीत टाकण्यात आली.
व्हा. चेअरमन जयपाल कुंभोजे यांनी स्वागत केले. यावेळी संचालक धनगोंडा पाटील, सुनील तोरगल, प्रताप नाईक, रावसाहेब भगाटे, प्रमोद पाटील, भूपाल मिसाळ, संतोष महाजन, प्रकाश खोबरे, शोभा पाटील, रंजना निंबाळकर, प्रभारी कार्यकारी संचालक नंदकुमार भोरे, रेणुका शुगर्सचे वरिष्ठ जनरल मॕनेंजर प्रकाश सावंत, डेप्यू. जनरल मॕनेंजर सी. एस. पाटील, असि. जनरल मॕनेंजर संजय किल्लेदार, कामगार इंटक अध्यक्ष आझाद शेख, उपाध्यक्ष बापुसो उपाध्ये यांच्यासह इंटकचे सदस्य, कामगार, सभासद उपस्थित होते. संचालक प्रताप पाटील यांनी आभार मानले.
हेही वाचलंत का ?