बिरू व्हसपटे
शिरढोण : शिरढोण (ता .शिरोळ) येथे स्वच्छता, कचरा उठाव आणि सांडपाणी व्यवस्थेच्या बोजवाऱ्यावर दैनिक पुढारीने प्रसिद्ध केलेल्या सडेतोड वृत्ताची अखेर दखल घेण्यात आली आहे. तब्बल दोन वर्षांनंतर ग्रामपंचायतीने १८ कंत्राटी स्वच्छता कामगारांचे पथक नियुक्त करून गावातील स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या स्वच्छतेच्या प्रश्नाला गती मिळाली असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
शिरढोणमध्ये अनेक महिन्यांपासून कचरा उठाव विस्कळीत झाला होता. गावभागासह माळभागातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग, तुंबलेल्या गटारी आणि साचलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली होती. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यूसह साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला होता.
पुढारीतून वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासक तथा सरपंच सागर भंडारे व ग्रामसेवक विराज जथ्थे यांनी तातडीने हालचाल करत १८ कंत्राटी स्वच्छता कामगारांचे पथक कार्यरत केले. रविवारपासून माळभागासह गावातील सर्व प्रभागांत कचरा उठाव, गटार सफाई, रस्त्यांची स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे. स्वच्छता मोहीम नियमित राबवून कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
आता सातत्याची अपेक्षा...
ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम सुरू करून सकारात्मक पाऊल उचलले असले, तरी ही मोहीम केवळ काही दिवसांपुरती मर्यादित न राहता नियमितपणे राबविणे आवश्यक असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. कचरा उठाव वेळेवर होणे, गटारींची नियमित सफाई, सांडपाण्याचा योग्य निचरा आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता कायम राखल्यासच गावातील आरोग्यविषयक समस्या कायमस्वरूपी कमी होतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.