प्रकाश मोहरेकर
वारणानगर : कोल्हापूर जिल्ह्यातील निलेवाडीत महापुरापासून सुटका होण्यासाठी निलेवाडी - चिकुर्डे पूल दरम्यान मुख्य रस्ता व पूल बांधावा या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी उपोषणाला प्रारंभ झाला. दरम्यान हातकणंगलेचे आमदार डॉ. अशोकराव माने व तहसिलदार सुशील बेल्हेकर यांची भेटी दरम्यान सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडगा काढण्याचा निर्णय झाला मात्र कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत उपोषण चालू ठेवण्याचा ग्रामस्थांनी घेतला.
वारणा नदीकाठावर वसलेल्या निलेवाडी गावाला दरवर्षी महापुराचा फटका बसतो. महापुराच्या काळात गावाचा बाहेरील जगाशी संपर्क तुटतो. त्यामुळे गावासाठी कायमस्वरूपी पूल आणि रस्ता उभारावा, तसेच निलेवाडी-चिकूर्डे पूल आणि रस्त्याची उंची वाढवून तो मजबूत करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या मागणीसाठी ग्रामस्थांनी यापूर्वी अनेकदा प्रशासनाकडे निवेदने देऊन पाठपुरावा केला. मात्र, वारंवार आश्वासने मिळूनही प्रत्यक्षात ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
महापुराच्या काळात नागरिकांसह जनावरांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा नागरिकांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलवावे लागते. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आज स्वातंत्र्यदिनी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
आज दुपारी हातकणंगलेचे आमदार डॉ अशोकराव माने, तहसिलदार सुशील बेल्हेकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली यावेळी ग्रामस्थांसह महिलांनी प्रश्नांची भडिमार केला. यावेळी दोहोनी पुढील पावसाळ्यापूर्वी पूल व रस्ता होईल अशी ग्वाही दिली. त्यांनी जिल्हाधिकारी यांचेशी संवाद साधला सोमवारी (ता.१७) जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय झाला. यावेळी ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार नागरीकांनी व्यक्त केला.