नागाव : केंद्र सरकारकडून देशात घरगुती गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा नसल्याचे वारंवार जाहीर केले जात असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती विपरीत आहे. जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीचा गैरफायदा घेऊन काही गॅस वितरण कंपन्या आणि एजन्सी ग्राहकांशी अन्याय करत असून, बुकिंगपासून ते वितरणापर्यंत गोंधळ निर्माण झाला आहे.
ग्राहकांच्या तक्रारींनुसार, गॅस बुकिंगसाठी दिलेले हेल्पलाईन नंबर तासोंत लागत नाहीत. काही वेळा नंबर लागलाच, तरी आवश्यक ‘ओटीपी’ मोबाईलवर येत नाही. तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करून ग्राहकांना वेठीस धरले जात असल्याचे सांगितले जाते. याच तांत्रिक अडचणींचा गैरफायदा घेऊन काही वितरकांकडे सिलेंडर असूनही “गॅस उपलब्ध नाही” असे सांगून ग्राहकांना फसवले जात आहे.
गॅस का मिळत नाही, याबाबत विचारणा केल्यास वितरकांकडून समाधानकारक उत्तर ऐवजी अपमानास्पद वागणूक मिळते. “आमच्या हातात काही नाही, वरूनच गॅस येत नाही,” असे उत्तर देऊन ग्राहकांना पिटाळून लावले जाते. अनेक ठिकाणी वितरकांच्या कर्मचाऱ्यांकडून उद्धट संवाद साधल्याने सामान्य जनतेत संताप निर्माण झाला आहे.
सामान्य ग्राहकाला हक्काचा गॅस मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तर काही वितरक जागतिक युद्धाच्या भीतीचा फायदा घेत चढ्या दराने सिलेंडर विक्री करत आहेत. नागरिकांच्या आरोपांनुसार, ५०० ते ७०० रुपये अतिरिक्त मोजल्यास गॅस तत्काळ उपलब्ध केला जात आहे. व्यावसायिक वापरासाठी घरगुती सिलेंडरचा बेकायदेशीर पुरवठा सुरू असल्यामुळे सामान्य घरगुती ग्राहकांवर वेळ ओढवले जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
सरकार पुरवठा सुरळीत असल्याचे सांगत असताना वितरक कृत्रिम टंचाई निर्माण करत असतील, तर पुरवठा विभागाने गंभीरपणे हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. गॅस एजन्सींची तपासणी करून जे वितरक ग्राहकांना वेठीस धरत आहेत किंवा काळाबाजार करत आहेत, त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.