बांबवडे ; पुढारी वृत्तसेवा : सुपात्रे (ता. शाहूवाडी) येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात ४२ जण जखमी झाले आहेत. घरगुती गौरी-गणपती विसर्जनावेळी स्थानिक गावतलाव परिसरात सोमवारी (ता.५) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
फटाक्यांमधून उडालेली पुंगळी मधमाशांच्या पोळ्यात घुसल्याने बिथरलेल्या मधमाश्यांनी गावतलावावरील नागरिकांच्या जमावावर हल्ला चढवला. नागरिक बचावासाठी सैरावैरा धावले. यामुळे परिसरात एकच हलकल्लोळ माजला होता. दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे तसेच स्थानिक नागरिकांनी जखमींना उपचारांसाठी बांबवडे आरोग्यवर्धिनी केंद्रात तातडीने दाखल केले.
पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. ४२ जण जखमींपैकी ३८ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. एक महिला व तीन लहान मुले या उर्वरित जखमींवर आंतररुग्ण कक्षात उशिरापर्यंत उपचार सुरू होते. मधमाश्यांच्या हल्ल्यात संबंधित चारही रुग्ण तुलनेत अधिक प्रमाणात जखमी झाले असले तरी त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा